यंदाच्या आयसीसी चॅम्पियन्स ट्राॅफीतील दुसरा सामना भारत आणि बांगलादेश (India vs Bangladesh) संघात खेळला गेला. या सामन्यात भारताने 6 गडी राखून विजय मिळवला. या सामन्यात बांगलादेशने प्रथम फलंदाजी करत भारतासमोर 229 धावांचे लक्ष्य ठेवले होते.
प्रत्युत्तरादाखल, भारतीय संघाने 21 चेंडू शिल्लक असताना शानदार विजय मिळवला. भारताच्या विजयाचा सर्वात मोठा हिरो शुबमन गिल (Shubman Gill) ठरला. त्याने नाबाद 101 धावा करत भारताच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली.
दुबई क्रिकेट स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या या सामन्यात बांगलादेशने टाॅस जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. बांगलादेशचा अर्धा संघ 35 धावांवर बाद झाला होता. तौहिद हृदया आणि झाकीर अली यांनी 154 धावांची भागीदारी करत बांगलादेशला संकटातून बाहेर काढले. हृदयाने 100 धावा केल्या, तर अलीने 68 धावांचे महत्त्वपूर्ण योगदान दिले.
भारताकडून मोहम्मद शमीने (Mohammed Shami) 5, हर्षित राणाने (Harshit Rana) 3 आणि अक्षर पटेलने (Axar Patel) 2 विकेट्स घेतल्या. रोहित शर्माने झेल सोडल्यामुळे पटेल या सामन्यात हॅट्रिक घेण्यापासून वंचित राहिला.
गिलने आपल्या वनडे कारकिर्दीतील 8वे शतक झळकावले आहे. बांगलादेशविरूद्धच्या आपल्या 101 धावांच्या खेळीत त्याने 9 चौकारांसह 2 षटकार ठोकले. गिलचे हे वनडे सामन्यांमध्ये सलग दुसरे शतक आहे, याआधी त्याने इंग्लंडविरुद्धच्या वनडे मालिकेतील शेवटच्या सामन्यात 112 धावांची खेळी खेळली होती.
भारताने 144 धावांवर चौथी विकेट गमावली, त्यानंतर गिलने केएल राहुलसोबत नाबाद 87 धावांची भागीदारी करून भारताचा विजय निश्चित केला. राहुलने 41 धावांची नाबाद खेळी केली. या सामन्यात रोहित शर्माने 41 धावा केल्या, दरम्यान त्याने त्याच्या वनडे कारकिर्दीतील 11,000 धावाही पूर्ण केल्या. दुसरीकडे, विराट कोहली 22 धावांवर तंबूत परतला.
आता भारत आपला पुढचा सामना कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानशी खेळणार आहे. दरम्यान दोन्ही संघ (23 फेब्रुवारी) रोजी आमने-सामने असणार आहेत.
महत्त्वाच्या बातम्या-
अक्षरच्या विक्रमात रोहितची ‘चूक’, चाहत्यांचा संताप!
विराट कोहलीच्या आहाराबद्दल नवा वाद – विराट कोहलीने केला शाकाहारी असण्याचा खोटा दावा?
200 वनडे आणि आयपीएल सामन्यांचा ऐतिहासिक टप्पा पार करणारे 5 भारतीय खेळाडू





