दक्षिण आफ्रिका येथे खेळल्या जात गेलेल्या महिला अंडर 19 टी20 विश्वचषकात अंतिम सामना भारत आणि इंग्लंड यांच्या दरम्यान खेळला गेला. भारतीय संघाने या अंतिम सामन्यात जबरदस्त खेळ दाखवत इंग्लंडवर 7 गडी राखून विजय मिळवला. यासोबतच या पहिल्या विश्वचषकाचा मानकरी भारतीय संघ ठरला. कोणत्याही स्तरावरील भारतीय महिला क्रिकेट संघाचे हे पहिले विश्वविजेतेपद आहे.
Congratulations to the first ever champions of the Women's #U19T20WorldCup! ???????????? pic.twitter.com/hSE7Z6l4tW
— ICC (@ICC) January 29, 2023
पोचेस्ट्राम येथे खेळल्या गेलेल्या या सामन्यात भारतीय संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. उपांत्य सामन्यात एकतर्फी विजय मिळवलेल्या भारतीय संघासाठी गोलंदाजांनी हा अंतिम सामना अतिशय सोपा केला. स्पर्धेत सातत्यपूर्ण कामगिरी करत आलेल्या वेगवान गोलंदाज टिटस साधू हिने पहिल्या षटकात भारताला यश मिळवून दिले. त्यानंतर अर्चना देवी व पार्श्वी चोप्रा यांनी देखील तिला साथ दिली. तिघींनी प्रत्येकी दोनन बळी मिळवत इंग्लंडला केवळ 68 धावांवर सर्वबाद केले.
विजयासाठी मिळालेल्या या छोट्या धावांचा पाठलाग करताना भारतीय कर्णधार शफाली वर्मा हिने 11 चेंडूवर 15 धावा करत संघाला चांगली सुरुवात दिली. मात्र, शफाली व स्पर्धेत सर्वाधिक धावा करणारी श्वेता सेहरावत पाठोपाठ बाद झाल्या. मात्र, त्यानंतर गोंगडी त्रिशा व सौम्या तिवारी यांनी 46 धावांची भागीदारी करत संघाला विजयाच्या दिशेने नेले. विजयासाठी 3 धावांची गरज असताना त्रिशा बाद झाली. मात्र, त्यानंतर सौम्याने विजयाचे सोपस्कार पूर्ण केले.
पहिल्याच स्पर्धेत नेतृत्व करताना भारताला विश्वचषक जिंकून देणारी शफाली पहिली महिला कर्णधार ठरली. तर, कोणत्याही स्तरावरील विश्वचषकाचे भारतीय महिला संघाचे हे पहिले विजेतेपद ठरले.
(India U19 Womens Won T20 Cricket World Cup After Beating England)