भारतीय क्रिकेट संघ जागतिक कसोटी चॅम्पियनशिपचा अंतिम सामना व इंग्लंडविरुद्धची पाच कसोटी सामन्यांची मालिका खेळण्यासाठी इंग्लंडला पोहोचला आहे. सध्या भारतीय संघ साऊथॅम्पटन येथे क्वारंटाईन असून, तीन दिवसांनंतर ते सरावाला सुरुवात करतील. भारत व इंग्लंड यांच्यातील कसोटी मालिकेला आणखी दोन महिन्याचा कालावधी शिल्लक असताना भारताचे सर्वकालीन महान फलंदाज सुनील गावसकर यांनी या मालिकेत भारतीय संघ वर्चस्व गाजवेल असे भाकीत वर्तवले आहे.
या कारणाने भारत जिंकणार मालिका
भारतीय संघ या दौऱ्यावर सर्वप्रथम न्यूझीलंडविरुद्ध साऊथॅम्पटन येथे जागतिक कसोटी चॅम्पियनशिपचा अंतिम सामना खेळेल. हा सामना १८ ते २२ जून दरम्यान खेळला जाईल. या सामन्यानंतर इंग्लंडविरुद्धची कसोटी मालिका ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीला सुरु होईल.
या मालिकेविषयी बोलताना भारताचे दिग्गज फलंदाज सुनील गावसकर यांनी म्हटले, “भारत-इंग्लंड मालिका जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यानंतर ६ आठवड्यांनी सुरु होईल. या सामन्याचा निकाल काहीही लागला तरी, भारतीय संघावर त्याचा प्रभाव राहणार नाही. भारतीय संघ या मालिकेत एकही सामना न गमावता ४-० अशा फरकाने विजय मिळवेल.”
गावसकर यांनी या भाकीतामागे कारण देताना सांगितले, “ही मालिका ऑगस्ट-सप्टेंबर या काळात होणार असून वातावरण भारताच्या फायद्याचे असेल. इंग्लंड संघ भारतात आला असताना, भारताने फिरकीला मदतगार खेळपट्ट्या बनविलेल्या. त्यामुळे, इंग्लंड या मालिकेत वेगवान गोलंदाजांना पोषक खेळपट्ट्या बनवेल. भारताकडे दर्जेदार वेगवान गोलंदाज असल्याने ते याचा फायदा उठवतील.”
भारतीय संघात सध्या जसप्रीत बुमराह, इशांत शर्मा, मोहम्मद शमी, उमेश यादव व मोहम्मद सिराज हे वेगवान गोलंदाज आहेत.
इंग्लंडमध्ये भारताची खराब कामगिरी
भारतीय संघ इंग्लंडमध्ये २००७ पासून कसोटी मालिका जिंकू शकला नाही. २०११ मध्ये ४-०, २०१४ मध्ये ३-१ व २०१८ मध्ये ४-१ असा भारताला पराभव पत्करावा लागला आहे. इंग्लंडमध्ये खेळलेल्या ६२ सामन्यात भारताला केवळ ७ विजय मिळवण्यात यश आले असून, ३४ सामन्यात पराभव पत्करावा लागला आहे. तर, उर्वरित २१ सामने अनिर्णित राहिले आहेत.
महत्त्वाच्या बातम्या –
पंतच्या गर्लफ्रेंडने सुरु केले फॅशन स्टोअर; रिषभने दिली ‘अशी’ प्रतिक्रिया






