भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली याने आगामी टी२० विश्वचषकानंतर टी२० संघाच्या कर्णधारपदाचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतला आहे. त्याने सोशल मीडियावर एक पोस्ट टाकत ही माहिती दिली आहे. त्याने दिलेल्या माहितीनंतर भारतीय संघाच्या ड्रेसिंग रूममधील अनेक गोष्टी समोर येत आहेत. अशात एक मोठी माहिती समोर येत आहे की, विराट कोहलीने निवडकर्त्यांसमोर रोहित शर्माला एकदिवसीय आणि टी२० संघाच्या उपकर्णधार पदावरून हटवण्याचा प्रस्ताव मांडला होता.
पीटीआयने दिलेल्या माहितीनुसार, विराट कोहलीने संघ निवडकर्त्यांकडे प्रस्ताव दिला होता की, रोहित शर्माला मर्यादित संघाच्या उपकर्णधार पदावरून हटवावे. कारण त्याचे वय ३४ वर्ष आहे. एकदिवसीय संघाचा उपकर्णधार केएल राहुलला केले गेले पाहिजे असे त्याचे मत होते. तसेच टी२० संघाच्या उपकर्णधारपदाची जबाबदारी रिषभ पंतला दिली जावी, असे मत त्याने बीसीसीआयपुढे मांडले होते.
याबद्दल बीसीसीआयच्या एका सूत्राने पीटीआयला सांगितले की, “बोर्डाला विराट कोहलीचा हा निर्णय अजिबात आवडला नाही. त्यांनी त्याचा हा प्रस्ताव नाकारला. कारण, कोहलीला कोणीही खरा उत्तराधिकारी नको आहे, असा समज बीसीसीआयच्या मनात निर्माण झाला.”
विराट युवा खेळाडूंची अर्ध्या वाटेत साथ सोडतो!
विराटवर अशीही टीका होते आहे की, तो युवा खेळाडूंची अर्ध्या वाटेत साथ सोडतो. तो खेळाडूंच्या कठीण काळात त्यांना त्याना पाठिंबा देत नाही. याविषयी एका अन्य क्रिकेटरने सांगितले की, “ऑस्ट्रेलियामध्ये पाच विकेट्सची कामगिरी केल्यानंतर कुलदीप यादव संघ नियोजनातून बाहेर करण्यात आले. रिषभ पंत जेव्हा फाॅर्ममध्ये नव्हता तेव्हा त्याच्यासोबतही असेच झाले. भारतीय खेळपट्टीवर ठोस प्रदर्शन करणारा वरिष्ठ गोलंदाज उमेश यादवला अजून याचे उत्तर मिळाले नाही की, कोणाला दुखापत होईपर्यंत त्याच्या नावावर विचार का केला जात नाही?”
विराटसोबत संवादाचा अभाव
एका माजी खेळाडूने पीटीआयशी अनधिकृत चर्चा करताना सांगितले होते की, “विराटसोबत संवादाची समस्या आहे. महेंद्रसिंग धोनीबाबत सांगायचे झाल्यास, त्याची खोली २४ तास उघडी असायची आणि खेळाडू आत जाऊ शकत होते, व्हिडिओ गेम खेळू शकत होते, जेवण करू शकत होते आणि गरज पडली तर क्रिकेटविषयीही चर्चा करू शकत होते. पण मैदानाबाहेर कोहलीशी संपर्क साधणे खूप कठीण आहे.”
माजी क्रिकेटपटूने पुढे सांगितले की, “रोहितमध्ये धोनीची झलक आहे पण, थोड्या वेगळ्या प्रकारे. तो युवा खेळाडूंना जेवणासाठी घेऊन जातो. जेव्हा ते निराश होतात तेव्हा त्यांची पाठ थोपटतो आणि त्याला खेळाडूंची मानसिकतेविषयी माहिती आहे.”
महत्त्वाच्या बातम्या-
टी२० क्रिकेटमध्ये धोनीनंतर कोहलीच आहे ‘कॅप्टनकूल’, भारताला जिंकून दिलेत भरपूर सामने
रोहित शर्मा का व्हायला हवा भारताच्या टी२० संघाचा कर्णधार, ‘ही’ आहेत ३ महत्त्वाची कारणं
रोहितला भारताच्या टी२० संघाचे नेतृत्वपद मिळवण्याच्या शर्यतीत टक्कर देऊ शकतात ‘हे’ २ क्रिकेटर