---Advertisement---

बुमराहविषयी विचारलेला प्रश्न ऐकून चकित झाला राहुल; म्हणाला, ‘सर, मला माहिती नाही’

On: सोमवार, ऑगस्ट 9, 2021 10:37 AM
---Advertisement---

भारत आणि इंग्लंड यांच्यात नुकताच नॉटिंघममध्ये पहिला कसोटी सामना पार पडला आहे. या खेळल्या गेलेल्या पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना अनिर्णित राहिला आहे. या सामन्याच्या शेवटच्या आणि पाचव्या दिवशी पावसाने खोडा घातला. परिणामी दिवसाभरात एकही चेंडू टाकता आला नाही. ज्यामुळे पंचांना हा सामना अनिर्णित घोषित करावा लागला आहे.

दरम्यान हा सामना भारतीय वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहसाठी खूप चांगला राहिला. त्याने उत्कृष्ट कामगिरी करत ९ विकेट्स घेतल्या आहेत. सामन्यानंतर सलामीवीर केएल राहुलला त्याच्याबद्दल प्रश्न विचारण्यात आला, ज्यावर त्याने आश्चर्यचकित होत उत्तर दिले आहे.

न्यूझीलंड विरुद्धच्या जागतिक कसोटी अजिंक्यपद अंतिम सामन्यात बुमराह लयीमध्ये दिसत नव्हता. याशिवाय, ऑस्ट्रेलिया दौरा आणि इंग्लंडविरुद्ध घरच्या मैदानावरील त्याची कामगिरीही प्रभावी दिसून आली नव्हती. पहिल्या कसोटी सामन्यानंतर राहुलला बुमराह फॉर्ममध्ये परतल्याचे पाहून तुला कसे वाटते आहे?, असा प्रश्न विचारण्यात आला. यावर राहुलने आश्चर्य व्यक्त केले आहे.

सामन्यानंतरच्या पत्रकार परिषदेत राहुल म्हणाला की, ‘सर, मला नाही माहिती की, बुमराहने पुनरागमन केले आहे की नाही? त्याने प्रत्येक वेळी प्रत्येक सामन्यात प्रत्येक परिस्थितीत स्वतःला सिद्ध केले आहे आणि तो आमचा नंबर एक गोलंदाज आहे. आम्हाला आनंद आहे की, त्याने त्याच्या कारकिर्दीतील पहिल्या कसोटी सामन्यापासून जे केले आहे, ते तो अजूनही करत आहे.’

दोन दिवसांपूर्वीच राहुलने सामन्यात २० बळी घेणाऱ्या वेगवान गोलंदाजी आक्रमणाचीही प्रशंसा केली होती. राहुल म्हणाला होता की, ‘पहिल्या डावात आम्ही ज्या प्रकारची गोलंदाजी केली आणि नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम गोलंदाजी करताना ज्याप्रकारची शिस्त आम्ही दाखवली ती सकारात्मक बाजू आहे. या सामन्यापूर्वी असे गृहीत धरले गेले होते की, नाणेफेक जिंकणारा संघ फायद्याच्या स्थितीत असेल. मात्र आम्ही अत्यंत शिस्तीने गोलंदाजी केली आहे.’

‘ज्याप्रकारे मोहम्मद शमी आणि जसप्रीत बुमराहने सुरुवात केली. त्याचबरोबर शार्दुल ठाकूर आणि मोहम्मद सिराज यांनी चांगली सुरुवात केली. त्या सर्वांनी एकत्र काम केले आणि योग्य ठिकाणी गोलंदाजी केली, ते खूप चांगले आहे. सर्व गोलंदाज त्यांच्या योजनेवर काम करत आहेत आणि त्यांना त्याचे फळही मिळाले आहे.’

भारत आणि इंग्लंड संघांमध्ये दुसरा कसोटी सामना १२ ऑगस्टपासून खेळला जाणार आहे. हा सामना लंडनच्या लॉर्ड्स मैदानावर खेळला जाणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

भारत विजयपथावर असताना पहिली कसोटी ड्रॉ; कोहली म्हणाला, ‘अतिशय लाजिरवाणी गोष्ट आहे की..’

इंग्लंडविरुद्ध ९ विकेट्स घेऊनही बुमराहला का मिळाला सामनावीर पुरस्कार? घ्या जाणून

भारीच की! रुट जेव्हा ‘अशी’ कामगिरी करतो, तेव्हा इंग्लंड कधीच पराभूत होत नाही, वाचा सविस्तर

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---