या वर्षाच्या अखेरीस भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात कसोटी मालिका खेळली जाईल. भारतीय संघ आयपीएलसंपल्यानंतर ऑस्ट्रेलियाविरुद्ध कसोटी मालिका खेळण्यासाठी यूएईतून थेट ऑस्ट्रेलियाला रवाना होईल. म्हणजे यूएईमधील एका जैव सुरक्षित वातावरणातून ऑस्ट्रेलियातील दुसऱ्या जैव सुरक्षित वातावरणात त्यांचे स्थानांतर होईल.
मात्र जे भारतीय खेळाडू आयपीएलमध्ये खेळत नाहीत आणि ऑस्ट्रेलियाविरुद्ध कसोटी मालिका खेळणार आहेत त्या खेळाडूंनाही आधी यूएई येथे जावे लागणार आहे आणि त्यानंतर भारतीय संघ आणि सपोर्ट स्टाफ ऑस्ट्रेलियाला रवाना होतील. त्यासाठी जे खेळाडू सध्या आयपीएल खेळत नाहीत पण ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणार आहेत. त्यांना यूएईमध्ये गेल्यानंतर 6 दिवस क्वारंटाईन राहावे लागेल.
सध्या दुबई येथे असलेल्या बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्याने पीटीआयला सांगितले की, दुबईतून संपूर्ण भारतीय संघ एकत्रितपणे चार्टर्ड विमानने ऑस्ट्रेलियाला रवाना होईल. दोन अनुभवी कसोटी फलंदाज चेतेश्वर पुजारा आणि हनुमा विहारी व्यतिरिक्त मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री,गोलंदाजी प्रशिक्षक भरत अरुण,फलंदाजी प्रशिक्षक विक्रम राठोड आणि क्षेत्ररक्षण प्रशिक्षक आर श्रीधर या महिन्याच्या शेवटी दुबईला येतील. या सर्वांसाठी दुबईत 6 दिवसांसाठी वेगळे जैव सुरक्षित वातावरण तयार केले जाईल. पहिल्या, तिसर्या आणि सहाव्या दिवशी त्यांची कोविड-19 ची चाचणी होईल. आयपीएल संपल्यानंतर ते ऑस्ट्रेलियाला रवाना होतील.
भारतीय संघातील बहुतेक सदस्य सध्या जैव सुरक्षित वातावरणात आहेत. म्हणूनच, दुबईतच उर्वरित भारतीय सदस्यांसाठी जैव सुरक्षित वातावरण निर्माण करणे अधिक व्यावहारिक असेल. क्रिकेट ऑस्ट्रेलियाने या दौऱ्यासाठी प्रारंभिक वेळापत्रक पाठवले आहे पण सध्या कोविड -19 ची देशातील परिस्थिती लक्षात घेता तारखा आणि ठिकाणे बदलण्याची शक्यता आहे.
ऍडलेड, पर्थ किंवा मेलबर्न यातील कोणत्या शहरात भारतीय संघ सर्वात आधी जाईल, हे अद्याप ठरलेले नाही. याव्यतिरिक्त क्रिकेट ऑस्ट्रेलियाशी क्वारंटाईनच्या नियमांसंदर्भात चर्चा करण्यात येणार आहे.