काही दिवसांपूर्वी पार पडलेल्या टी-२० विश्वचषकात भारतीय संघाचे प्रदर्शन निराशाजनक होते. विश्वचषकादरम्यान भारताला पाकिस्तानकडून मोठ्या पराभवाचा सामना करावा लागला होता. यानंतर आता पाकिस्तान संघाचे माजी कर्णधार इंजमाम उल हक यांनी या सामन्याविषयी मोठी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांच्या मते भारत पाकिस्तान यांच्यातील सामना सुरू होण्यापूर्वीच भारतीय संघ दबावात होता आणि त्याचा परिणाम त्यांच्या खेळीतून दिसला.
इंजमामच्या मते भारतीय संघ दबावात आला होता आणि हे त्यांच्या बॉडी लॅंग्वेजवरून समजले होते. इंजमाम पाकिस्तानमधील एका माध्यमाशी याविषयी बोलत होते.
ते म्हणाले की, “मला असे वाटते की, सामना सुरू होण्यापूर्वीच भारतीय खेळाडू घाबरले होते. त्यांच्या बॉडी लँग्वेजवरून हे कळत होते. जर तुम्ही नाणेफेकीच्या वेळची विराट कोहली आणि बाबर आजमची मुलाखत पाहिली, तर कळते कोण दबावात होते. आमच्या संघाची बॉडी लॅंग्वेज त्यांच्यापेक्षा खूप चांगली होती. असे नाहीय की भारतीय संघ रोहीत शर्मा बाद झाल्यानंतर दबावात आला, खरे तर रोहित शर्मा स्वतः दबावात होता. हे स्पष्ट कळत होते की, भारतीय खेळाडू दबावात होते. ”
टी-२० विश्वचषकात भारतीय संघाच्या अभियानाची सुरुवात पाकिस्तानविरुद्धच्या सामन्याने झाली होती. या पहिल्याच सामन्यात भारतीय संघाचा दारुण पराभव झाला होता. भारतीय संघाने या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना मर्यादित २० षटकांमध्ये सात विकेट्सच्या नुकसानावर १५१ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात पाकिस्तान संघाने हे लक्ष्य १८ व्या षटकात गाठले होते. पाकिस्तान संघासाठी हा त्यांचा एकदिवसीय आणि टी-२० विश्वचषकात भारतावर मिळवलेला पहिलाच विजय ठरला. पाकिस्तानने भारतावर हा पहिला विजय तब्बल १० विकेट्स राखून मिळवला होता.
भारतीय संघ खराब प्रदर्शनामुळे टी-२० विश्वचषकाच्या प्लेऑफमध्येही पोहचू शकला नाही. तर पाकिस्तान सर्वात आधी प्लेऑफमध्ये स्थान मिळवणारा संघ ठरला होता. असे असले तरी, उपांत्य सामन्यात ऑस्ट्रेलियाने पाकिस्तानचा पराभव केला आणि स्पर्धेतून बाहेर केले. विश्वचषकाचा अंतिम सामना न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलियामध्ये खेळला गेला, ज्यामध्ये ऑस्ट्रेलियाने विजय मिळवला. ऑस्ट्रेलियाने या विजयासह त्यांचा पहिला टी-२० विश्वचषक जिंकला आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
कानपूर कसोटीत सपशेल फेल ठरलेल्या मयंकच्या शैलीत आहे ‘या’ गोष्टीची कमी, दिग्गजाने दाखवली उणीव
“पुढील कसोटीत श्रेयसला संधी मिळण्याची शक्यता कमी”; लक्ष्मणने केले भाकित
भारत वि न्यूझीलंड, कानपूर कसोटी: दुसरा दिवस पाहुण्यांच्या नावे; सलामीवीरांची अभेद्य भागीदारी