मंगळवारी (२८ ऑक्टोबर) आयपीएल २०२० चा ४७ वा सामना दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध सनरायझर्स हैद्राबाद संघात झाला. या सामन्यात हैद्राबादच्या फलंदाजांनी दिल्लीच्या गोलंदाजांची अक्षरशः धुलाई केली. आणि त्यानंतर हैद्राबादच्या गोलंदाजांनी देखील दिल्लीच्या सर्व फलंदाजांना पूर्णपणे गारद केले.
हैद्राबाद कडून प्रथम फलंदाजी करताना बड्डे बॉय डेविड वॉर्नरने ३४ चेंडू आणि ८ चौकार,२ षटकारांसह ६६ धावा केल्या. या हंगामात जॉनी बेयरस्टोच्या जागी संधी मिळालेल्या वृद्धिमान साहाने मिळालेल्या संधीचं सोन्यात रूपांतर केले. साहाने ४५ चेंडूंचा सामना केला ज्यात त्याने १२ चौकार आणि २ षटकारांसह ८७ धावा केल्या. शतकाच्या अगदी जवळ असतानाच श्रेयस अय्यरच्या हाती झेल देऊन तो बाद झाला.
२२० धावांचा डोंगर गाठणारा दिल्लीचा संघ अवघ्या १३१ धावांवरच अडखळून पडला. दिल्लीने या सामन्यात केलेल्या ३ चुकांमुळे त्यांचे ‘प्ले ऑफ’ साठीचे तिकीट आता आणखीनच लांबले आहे. पाहुयात काय आहेत ती नेमकी ३ महत्त्वाची कारणं.
१. दिल्लीने आखला नव्हता ‘प्लॅन बी’
गेल्या अनेक सामन्यात दिल्लीचा वेगवान गोलंदाज कागिसो रबाडा हा दिल्लीच्या संघाला चांगली सुरुवात करून देत होता. परंतु कालच्या सामन्यात त्याने पहिल्याच दोन षटकांत ३७ धावा दिल्याने दिल्लीचा संघ काहीसा गडबडला. रबाडा फ्लॉप झाल्यानंतर काय करावे ? यासाठीचा ‘प्लॅन बी’ दिल्लीच्या संघाने केलेलाच नव्हता. त्यामुळे ऐन वेळी कर्णधार श्रेयस अय्यरला नेमकी गोलंदाजी कुणाला द्यावी असे पेच प्रश्न पडू लागले. आणि प्लॅन बी नसल्याचा फायदा उचलत दोन्हीकडून धावांचा पाऊस पडू लागला. संघाचा महत्त्वाचा गोलंदाज आज पिसला गेल्याने बाकीच्या गोलंदाजांची देखील काहीशी घाबराहट होताना पाहायला मिळाली.
२. फलंदाजी क्रमवारीत अचानकपणे बदल करणे
२२० धावांचा डोंगर चढण्यासाठी दिल्ली केपीटल्सच्या संघाने त्यांचा संपूर्ण फलंदाजी क्रमच बदलवून टाकला. सलामीला उतरलेला शिखर धवन आजच्या सामन्यातही व्यर्थ ठरला. धवन भोपळ्यावर बसून गेल्याने दिल्लीचा संघ पटकन दबावात आला. तिसऱ्या क्रमांकावर श्रेयस अय्यर ऐवजी मधल्या फळीत खेळणारा मार्कस स्टॉयनिस फलंदाजीसाठी आला. अर्थात पावरप्लेमध्ये वेगाने धावा करण्याचा विचार दिल्लीचा होता. पण एक चौकार मारून संघाला ५ धावा देऊन तोही तंबूत परतला.
यानंतर लगेचच हेटमायर फलंदाजीसाठी उतरला आणि त्यालाही हैद्राबादने परत पाठवून दिले. अडखळलेला डाव सावरण्याचा प्रयत्न रहाणे आणि पंतकडून होत असला तरीही ते मोठी धावसंख्या उभारू शकले नाहीत. फिनिशिंगसाठी मागे थांबलेला कर्णधार देखील बदललेल्या फलंदाजी क्रमवारीत सपशेल अपयशी झाला आणि पुढे दिल्लीच्या सर्व खेळाडूंनाच फलंदाजी करण्यास मैदानात उतरावे लागले.
३. ‘टार्गेट’ चा घेतला होता मोठा धसका
२२० धावांचा पाठलाग करण्यासाठी दिल्लीला ११ च्या रन रेट ने खेळण्याची आवश्यकता होती. आणि याच रन रेटला धरून चालण्यासाठी नको त्या वेळी नको ते फटके दिल्लीच्या फलंदाजांनी खेळले. ज्यामुळे दिल्लीचे अनेक फलंदाज झेलबाद होऊन तंबूत परतले. आणि शेवटपर्यंत दिल्लीच्या फलंदाजांना सूर काही गवसला नाही. रहाणे आणि पंतने काही वेळ तग धरला पण ते ही फार काळ टिकले नाहीत.
दिल्लीच्या संघाने हंगामाची सुरुवात चांगली केली होती. सुरुवातीपासूनच पहिल्या व दुसऱ्या स्थानावर दिल्ली विराजमान होत होती. परंतु हंगामाच्या शेवटी मात्र दिल्लीचा संघ पराभवाच्या छायेत येत असल्याचे दिसत आहे. दिल्लीने मागील तिन्ही सामने गमावले आहेत. ही मालिका अशीच शेवटपर्यंत गेली, तर दिल्लीला देखील बाहेरचा रस्ता पकडावा लागेल. दुसऱ्या डावात खेळताना दिल्ली हत्यार टाकते ही दिल्लीची कमजोरी आता इतर संघांना माहीत झाली असून दिल्लीविरुद्ध खेळताना प्राथमिक नियोजन म्हणजे पहिले फलंदाजीला उतरणे हेच आता बाकीचे संघ करत आहेत.
महत्त्वाच्या बातम्या-
-हैदराबादचे ‘हे’ पाच धुरंदर अख्ख्या दिल्लीवर पडले भारी; मिळवला दणदणीत विजय
ट्रेंडिंग लेख-
-बीडच्या छोट्याशा गावातील ‘या’ पोरानं क्रिकेटचं मैदान अक्षरशः दणाणून सोडलं
-…आणि सचिनचे शब्द हार्दिकने खरे करून दाखवले !
-चार असे निर्णय, जे ऑस्ट्रेलिया दौऱ्यात भारतीय कसोटी संघासाठी ठरु शकतात महागडे