नेहमी आयपीएल विजेतेपदासाठी प्रबळ दावेदार समजल्या जाणाऱ्या चेन्नई सुपर किंग्स संघाची यंदाच्या आयपीएल हंगामात मात्र खराब कामगिरी झाली आहे. चेन्नईने आत्तापर्यंत १३ व्या आयपीएल हंगामात १० सामन्यांत केवळ ३ विजय मिळवले आहेत. त्यामुळे आता चेन्नईसमोर प्लेऑफ अर्थात अंतिम चार संघात पोहचण्यासाठी कठीण आव्हाने आहेत. सध्या चेन्नई संघ गुणतालिकेत शेवटच्या स्थानावर आहे. पण अजूनही चेन्नईसाठी प्लेऑफमध्ये स्थान मिळवण्याची दारे पूर्णपण बंद झालेली नाहीत.
चेन्नई अजूनही प्लेऑफमध्ये कसे स्थान मिळवू शकते, त्यासाठी काय समीकरणे असतील, याचा आपण या लेखात आढावा घेऊ.
मुंबई, दिल्ली आणि बेंगलोरचा प्लेऑफमध्ये प्रवेश जवळपास निश्चित
सध्या गुणतालिकेत दिल्ली कॅपिटल्सचा संघ १० सामन्यातील ७ विजयांसह १४ गुण घेत अव्वल क्रमांकावर आहे. तसेच रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर १० सामन्यांतील ७ विजय आणि १४ गुणांसह दुसऱ्या क्रमांकावर आहे. तर मुंबई इंडियन्स ९ सामन्यांतील ६ विजयांसह १२ गुण मिळवत तिसऱ्या क्रमांकावर आहे. त्यामुळे सध्यातरी दिल्ली,बेंगलोर आणि मुंबई हे तीन संघ प्लेऑफमध्ये प्रवेश करण्यासाठी प्रबळ दावेदार आहेत.
त्यामुळे सध्या प्लेऑफमधील ४ थ्या स्थानासाठी कोलकाता नाईट रायडर्स, किंग्स इलेव्हन पंजाब, सनरायझर्स हैदराबाद, राजस्थान रॉयल्स आणि चेन्नई सुपर किंग्स संघात चूरस आहे. सध्यातरी कोलकाता १० सामन्यांत ५ सामने जिंकून १० गुणांसह चौथ्या क्रमांकावर आहे. तर हैदराबाद, पंजाब आणि राजस्थान प्रत्येकी ८ गुणांसह अनुक्रमे पाचव्या, सहाव्या आणि सातव्या क्रमांकावर आहे. तर चेन्नई ६ गुणांसह शेवटच्या स्थानावर आहे.
कोलकाता, हैदराबाद, पंजाब, राजस्थान आणि चेन्नई या पाच संघांपैकी केवळ राजस्थान संघाचे ११ सामने झाले आहेत. तर अन्य सर्व संघांचे आत्तापर्यंत १० सामने झाले आहेत.
प्लेऑफमध्ये पात्र ठरण्यासाठी चेन्नई समोरची समीकरणे –
चेन्नईचे अजून ४ सामने या हंगामातील बाकी आहेत. चेन्नईला मुंबई इंडियन्स, कोलकाता नाईट रायडर्स, रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर आणि किंग्स इलेव्हन पंजाब या संघांविरुद्ध हे ४ सामने खेळायचे आहेत. चेन्नईला जर प्लेऑफमध्ये पोहचायचे असेल तर हे सर्व ४ सामने जिंकावे लागणार आहेत. जेणेकरुन त्यांचे १४ गुणतरी होतील आणि त्यांच्या प्लेऑफच्या आशा कायम राहतील.
पण याचबरोबर चेन्नईला अन्य संघांच्या सामन्यांच्या निकालावरही अवलंबून राहावे लागेल. चेन्नईला आशा करावी लागेल की कोलकाता त्यांच्या उर्वरित ४ सामन्यांपैकी किमान ३ सामने हारतील. तसेच राजस्थान, पंजाब आणि हैदराबादही त्यांच्या प्रत्येकी २ सामन्यात पराभूत होतील. तर जेणेकरुन त्यांचे १२ पेक्षा अधिक गुण होणार नाहीत. जर असे झाले तर चेन्नई कोणत्याही अडचणी शिवाय प्लेऑफमध्ये पोहचेल.
जर नेट रनरेटचा प्रश्न उद्भवला तर…
जर चेन्नईने उर्वरित सर्व ४ सामने जिंकले आणि १४ गुण मिळवले तरी अन्य संघही १४ गुण मिळवू शकतात, अशा परिस्थितीत नेट रनरेटचा आधार घेतला जाईल. त्यामुळे चेन्नईला त्यांच्या उर्वरित सामन्यात मोठ्या फरकांनी विजय मिळवावे लागणार आहे, जेणेकरुन त्यांचा नेट रनरेट सुधारेल.
शुक्रवारी जर मुंबई इंडियन्स विरुद्ध पराभव झाला तर…
शुक्रवारी(२३ जानेवारी) मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्सचा सामना होणार आहे. या सामन्यात जर चेन्नईला पराभवाचा सामना करावा लागला तरी चेन्नई संघ १२ गुणांसह प्लेऑफमध्ये प्रवेश करु शकतो. पण मग त्यासाठी त्यांच्यासमोरील आव्हाने आणखी कठीण होतील आणि एवढेच नाही तर अन्य संघांच्या निकालावर अवलंबून रहावे लागेल.
महत्त्वाच्या बातम्या –
भारताचे दिग्गज क्रिकेटपटू कपिल देव यांना हृदयविकाराचा झटका, रुग्णालयात उपचार सुरु
“आर्चरने तिसरे षटक फेकले असते तर…”, राजस्थानविरुद्धच्या दमदार खेळीनंतर मनीष पांडेची प्रतिक्रिया
चेन्नईचे तारणहार बनण्यास तयार आहेत ४ युवा प्रतिभावान खेळाडू ; मुंबईविरुद्ध मिळणार संधी?
ट्रेंडिंग लेख –
स्टेडियममध्ये प्रेक्षक नसतानाही सामना पाहाताना कोठून येतो त्यांचा आवाज? घ्या जाणून
नजर हटी, दुर्घटना घटी: दांडी उडवून गेलेल्या चेंडूला वाईड देणारे डॅरेल हार्पर
आयपीएल २०२०: पॉवरप्लेमध्ये एका षटकात सर्वाधिक धावा देणारे ३ गोलंदाज