इंडियन प्रीमीयर लीग २०२१ हंगाम मंगळवारी (४ मे) तात्काळ स्थगित करण्याचा निर्णय भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) घेतला. यानंतर अनेक चर्चांना सुरुवात झाली. त्यातील महत्त्वाची चर्चा म्हणजे परदेशी खेळाडूंना मायदेशी पुन्हा कसे पाठवले जाणार? कारण अनेक देशांनी भारतातून येणाऱ्या नागरिकांसाठी कडक निर्बंध घातले आहेत. यात ऑस्ट्रेलियाचा देखील समावेश आहे.
ऑस्ट्रेलियन सरकारने १५ मे पर्यंत भारतातून परत येणाऱ्या नागरिकासांठी सीमाबंदी केली आहे. त्यामुळे आयपीएलमध्ये सहभागी असेलेल्या १४ ऑस्ट्रेलियन खेळाडूंसह प्रशिक्षक आणि समालोचकांसमोर परत ऑस्ट्रेलियाला जाण्यासाठी पेच उभा राहिला आहे. सध्यातरी हे ऑस्ट्रेलियन सदस्य मालदिवला जाण्याची शक्यता आहे. तेथून ऑस्ट्रेलियाला जाण्याचा त्यांचा विचार असल्याचे समजत आहे.
इएसपीएनने दिलेल्या वृत्तानुसार बरेच ऑस्ट्रेलियन खेळाडू, प्रशिक्षक आणि समालोचक मालदीपला जाण्याचा उपाय शोधू शकतात. आयपीएलच्या बायोबबलमध्ये खेळाडू, प्रशिक्षक आणि समालोचक मिळून साधारण ४० लोक होते. हे सर्व मालदीवमध्ये समालोचक मायकल स्लेटरला जोडले जातील. स्लेटर काहीदिवसांपूर्वीच मालदीवला आले होते.
ऑस्ट्रेलियाचा आणि कोलकाता नाईट रायडर्सचा वेगवान गोलंदाज पॅट कमिन्सने फॉक्स स्पोर्ट्सशी बोलताना म्हटले आहे की ‘जेव्हा आम्ही ऑस्ट्रेलियातून बाहेर पडलो होतो, तेव्हा आम्हाला माहित होते की आम्हाला पुन्हा परतल्यानंतर १४ दिवसांच्या क्वारंटाईन कालावधीतून जावे लागेल. जेव्हा सीमाच बंद झाल्या, यापूर्वी कोणीही हे अनुभवले नव्हते.’
तसेच तो म्हणाला, ‘इथे असलेल्या ऑस्ट्रेलियन सदस्यांसाठी चिंता आहे. पण आम्ही या स्पर्धेत जूनच्या सुरुवातीपर्यंत खेळण्यासाठी आलो होते. त्यामुळे आशा आहे की १५ मेनंतर सीमा खुल्या होतील आणि आम्ही परत जाऊ शकू.’
ब्रिजेश पटेल यांनी दिला दिलासा
आयपीएलचे अध्यक्ष ब्रिजेश पटेल यांनी परदेशी खेळाडूंबद्दल बोलताना म्हटले आहे की त्यांना सुखरुप मायदेशी पाठवणे गरजेचे आहे आणि त्यासाठी आम्ही मार्ग शोधत आहोत.
“सरकारचे नियम मोडणार नाही” – क्रिकेट ऑस्ट्रेलिया
क्रिकेट ऑस्ट्रेलिया आणि ऑस्ट्रेलियन क्रिकेटर्स असोसिएशनने संयुक्तपणे दिलेल्या निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे की सरकारच्या नियमाच्या विरोधात ते जाणार नाहीत.
या निवेदनात म्हटले आहे की, “खेळाडूंच्या आणि सहभागी व्यक्तींच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने बीसीसीआयने घेतलेल्या निर्णयाचा आम्ही आदर करतो. क्रिकेट ऑस्ट्रेलिया बीसीसीआयच्या संपर्कात असून आम्ही सर्व खेळाडू तसेच समालोचक आणि इतर सहभागी व्यक्ती यांना सुखरूप परत आणण्याच्या पर्यायांचा विचार करतो आहोत. ऑस्ट्रेलियन सरकारच्या भारतातून येणाऱ्या प्रवाशांवर १५ मेपर्यंत बंदी घालण्याच्या निर्णयाचाही आम्ही आदर करतो. या नियमात आम्ही कुठलीही सवलत मागणार नाही.”
त्यामुळे आता ऑस्ट्रेलियन सदस्यांबद्दल काय निर्णय होणार आणि ते घरी कसे परतणार हे पाहावे लागणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
चेन्नई सुपर किंग्जच्या खेळाडूची संवेदनशीलता, भारताला केली कोरोनाविरोधी लढ्यासाठी ‘ही’ मदत
आयपीएल रद्द झाल्याने दिल्ली कॅपिटल्सच्या ‘या’ खेळाडूंनी धरली मायदेशाची वाट