आयपीएल २०२१चा हंगाम कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे यंदा चांगलाच गाजला. सर्वप्रथम भारतात कोरोनाच्या वाढत्या रूग्णसंख्येमुळे आयोजन होणार की नाही ही शंका असतांना देखील एप्रिल-मे महिन्यात या हंगामाला सुरुवात झाली. मात्र हंगाम मध्यात आला असतांना खेळाडू, सपोर्ट स्टाफ आणि कर्मचार्यांना देखील कोरोनाची लागण व्हायला सुरुवात केली. त्यामुळे बीसीसीआयने हा हंगाम तात्पुरता स्थगित करण्यात येत असल्याची घोषणा केली.
त्यानंतर २९ मे रोजी बीसीसीआयच्या सर्वसाधारण बैठकीत उर्वरित हंगाम संयुक्त अरब अमिरातीत अर्थात युएईमध्ये खेळवण्यात येणार असल्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार आता येत्या सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यात हे सामने खेळवण्यात येणार आहेत. अद्याप बीसीसीआयने संपूर्ण वेळापत्रक जाहीर केले नसले तरी अंतिम सामना १० ऑक्टोबरला खेळवण्यात येईल, अशी शक्यता वर्तविण्यात येत होती. मात्र आता अंतिम सामन्याची एक नवीन तारीख पुढे येत आहे.
‘या’ तारखेला होईल अंतिम सामना
यापूर्वी १० ऑक्टोबरला अंतिम सामना खेळवला जाईल, अशी अटकळ बांधण्यात येत होती. मात्र आता हा सामना १८ ऑक्टोबरला खेळवण्यात येण्याची शक्यता आहे. युएई मधील गरमी हे यामागील प्रमुख कारण असल्याचे समोर येत आहे. खेळाडूंचा यापासून बचाव व्हावा, म्हणून हंगाम अधिक लांबवण्यात येऊ शकतो.
जर १० ऑक्टोबर पर्यंत हंगाम संपवायचा असेल, तर काही वेळा डबल हेडर सामने अर्थात एकाच दिवशी दोन सामने खेळवावे लागतील. मात्र युएईमध्ये दुपारच्या उन्हात खेळाडूंना सामने खेळायला लावणे, त्रासदायक ठरू शकते. हे टाळण्यासाठीच कमीत कमी डबल हेडर सामने खेळवल्या जाऊ शकतात. आणि परिणामी आयपीएलचा अंतिम सामना १८ ऑक्टोबर रोजी खेळवला जाऊ शकतो.
याबाबत बोलतांना बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, “आम्हाला यामुळे ८ दिवसांची मुदत वाढ मिळेल आणि आम्ही डबल हेडर सामने कमी करू शकू. युएईमध्ये खूप गरमी आहे आणि खेळाडूंना याचा फटका बसू शकतो. त्यामुळेच आम्ही दुपारचे सामने कमी करण्याच्या प्रयत्नात आहोत.” आता त्यामुळे १८ ऑक्टोबर पर्यंत आयपीएल लांबण्याची शक्यता असली तरी याबाबत बीसीसीआयने अधिकृत वेळापत्रक जाहीर केल्यावरच निश्चित योजना समोर येईल.
महत्त्वाच्या बातम्या –
बंधुप्रेम! छोट्या भावाची मोठ्या भावाकडून तोंडभरुन स्तुती, पाहा काय म्हणाला
मोठा झटका! ‘या’ कारणामुळे भारतीय कुस्तीपटू सुमित मलिक टोकियो ऑलम्पिकमधून निलंबित