टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत फ्रीस्टाइल प्रकारात म्हणजेच १२५ किलो वजनी गटात भारताच्या पदक जिंकण्याच्या आशेला मोठा झटका बसला आहे. या वजनी गटातून ऑलिम्पिकसाठी पात्र ठरलेला भारतीय कुस्तीपटू सुमित मलिक उत्तेजक चाचणीत दोषी आढळला आहे. त्यामुळे आता सुमितच्या टोकियो ऑलिम्पिक मध्ये भाग घेण्याच्या आणि पदक मिळवण्याच्या आशेला सुरुंग लागला आहे.
जागतिक कुस्ती महासंघाद्वारे ६ ते ९ मे दरम्यान बल्गेरिया शहरात ऑलिम्पिक पात्रता फेरीचे आयोजन करण्यात आले होते. या पात्रता फेरीतून त्याने १२५ किलो वजनी गटातून टोकियो ऑलिम्पिकचे तिकीट मिळवले होते. मात्र त्यावेळी सुमित मलिकची उत्तेजक चाचणी करण्यात आली होती. या चाचणीत तो दोषी आढळला आहे.
आता समोर आलेल्या माहितीनुसार ऑलिम्पिक मधील १२५ किलो वजनी गटातील जागा भारताला या कारणामुळे गमवावी लागणार आहे. यापूर्वी असा अंदाज बांधला जात होता की सुमित मलिक उत्तेजक चाचणीत दोषी आढळला असला तरी देखील त्याला टोकियो ऑलिम्पिक मधून निलंबित केले जाणार नाही. मात्र आता तो आगामी ऑलिम्पिक मध्ये भाग घेणार नाही हे स्पष्ट झाले आहे.
पात्रता फेरीत जिंकले होते रौप्य पदक
बल्गेरिया येथे झालेल्या ऑलम्पिक पात्रता फेरीत दिल्लीचा कुस्तीपटू सुमित मलिकने शानदार कामगिरी केली होती. या पात्रता फेरीच्या उपांत्य सामन्यात सुमितने व्हेनेझुएलाचा कुस्तीपटू डॅनियल डियाजला ५-० अशी मात देत अंतिम सामन्यात धडक मारली होती. अंतिम सामन्यात दुखापतीमुळे त्याला माघार घ्यावी लागली होती. त्यामुळे रौप्य पदकावर त्याला समाधान मानावे लागले होते. परंतु या पात्रता फेरीत अंतिम सामन्यात पोहोचलेल्या प्रत्येक कुस्तीपटूला टोकियो ऑलम्पिकचे तिकीट मिळाले होते. सुमित मलिक देखील यामुळेच टोकियो ऑलिम्पिकसाठी पात्र ठरला होता.
मात्र आता टोकियो ऑलिम्पिकसाठी अवघे ४९ दिवस राहिले असतांना हे वृत्त समोर आले आहे. उत्तेजक चाचणीत दोषी आढळल्याने सुमित मलिक टोकियो ऑलिम्पिक मध्ये भाग घेणार नाही, हे जवळपास निश्चित झाले आहे. त्यामुळे भारताच्या आगामी ऑलिम्पिक मध्ये कुस्ती मध्ये पदक जिंकण्याच्या आशेला जबर झटका बसला आहे. आता भारताची भिस्त रवी दहिया, बजरंग पुनिया आणि दीपक पुनिया या कुस्तीपटूंवर असेल.
महत्वाच्या बातम्या-
फलंदाजांची फिरकी घेणारा भज्जी बनला ‘कूक’, त्याने बनवलेला पदार्थ बघून तोंडात येईल पाणी
भारतीय खेळाडूंसमोर असेल ‘हे’ आव्हान; इंग्लंडमध्ये असलेल्या विहारीचे वक्तव्य
विराटपेक्षा रोहित आहे यशस्वी कर्णधार, ‘ही’ आहेत त्यामागची ५ समर्पक कारणे