इंडियन प्रीमियर लीग २०२६ स्पर्धेचे साखळी सामने २४ मे ला संपत आहेत. प्लेऑफचा टप्पा जवळ येत असून अंतिम सामना आणि इतर प्लेऑफच्या सामन्यांचे ठिकाण जाहीर करण्यापूर्वी बीसीसीआयसमोर एक नवीन आव्हान उभे राहिले आहे. मागील हंगामात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने विजेतेपद जिंकले होते, त्यामुळे पुढील हंगामाचा अंतिम सामना गतविजेत्याच्या घरच्या मैदानावर खेळला जातो. त्यामुळे नियोजन केल्याप्रमाणे आयपीएल २०२६ चा अंतिम सामना बंगळुरूच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर होणार होता, मात्र त्यामध्ये एक अडचण निर्माण झाली आहे.
आमदारांच्या तिकीट समस्यांमुळे आयपीएल २०२६ चा अंतिम सामना बंगळुरूमध्ये होणार की नाही याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. बीसीसीआयचे सचिव देवजित सैकिया यांनी सांगितले की, प्लेऑफचे वेळापत्रक लवकरच जाहीर केले. एएनआयच्या माहितीनुसार, बीसीसीआयच्या एका सूत्राने सांगितले की प्लेऑफ आणि अंतिम हे सामने पंजाब आणि कर्नाटकमध्ये होण्याची शक्यता आहे. अंतिम सामना गेल्या वर्षीच्या विजेत्या संघाच्या घरच्या मैदानावर म्हणजे आरसीबीच्या घरच्या मैदानावर व्हायला हवा, मात्र बंगळुरूच्या आमदारांच्या तिकिटांच्या मुद्द्यांमुळे समस्या निर्माण होत आहे. ही समस्या दूर झाली नाही तर अंतिम सामन्या इतर ठिकाणी आयोजित केला जाईल.
कर्नाटकातील हुनागुंडू विधानसभा मतदारसंघाचे कॉंग्रेस आमदार विजयानंद काशप्पनवर यांनी प्रत्येक आमदाराला आयपीएल सामन्यांची किमान पाच तिकीटे मिळावीत अशी जाहीर मागणी केली होती. या प्रकरणाचे गांभीर्य पाहून उपमुख्यमंत्री डीके शिवकुमार यांनी चिन्नास्वामी स्टेडियमवर प्रत्येक आमदाराला तीन तिकीटे देणार असे जाहीर केले होते. ती तिकीट केवळ आमदार आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांनाच वापरता येतील असे कर्नाटकच्या गृहमत्र्यांनी जाहीर केले, मात्र तरीही प्रकरण काही निवळले नाही.
प्लेऑफचा टप्पा जवळ आला असून त्या सामन्यांचे वेळापत्रक अद्यापही निश्चित नाही. आयपीएल २०२६ चा अंतिम सामना चिन्नास्वामी स्टेडियमवर होणारा की नाही याची सध्या कोणतीही स्पष्टता नाही.






