रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये शानदार कामगिरी केली आहे. संघाने गेल्या आठवड्यात श्रीलंकेविरुद्ध टी२० मालिका ३-० ने जिंकली. रोहित शर्माने नोव्हेंबरमध्ये पूर्णवेळ कर्णधारपदाची सूत्रे हाती घेतल्यापासून भारताने न्यूझीलंड, वेस्ट इंडिज आणि श्रीलंकेविरुद्धच्या घरच्या मालिका जिंकल्या आहेत. या विजयाची विशेष बाब म्हणजे संघातील युवा चेहऱ्यांना भरपूर संधी देण्यात आली. या खेळाडूंनी आपल्या कामगिरीने संघ व्यवस्थापनाची मनेही जिंकली. या मालिकेदरम्यान अनेक वरिष्ठ खेळाडू जखमी झाले तर, काहींना विश्रांती देण्यात आली होती.
भुवनेश्वर कुमार, शार्दुल ठाकूर आणि दीपक चहरसह वेगवान गोलंदाज हर्षल पटेल, मोहम्मद सिराज आणि आवेश खान यांना टी२० संघात संधी देण्यात आली आहे. श्रीलंकेविरुद्धच्या तिसऱ्या टी२० सामन्यात भारताने वरिष्ठ गोलंदाजांना विश्रांती दिली होती. या सामन्यात आवेश आणि सिराजने वेगवान गोलंदाजीची जबाबदारी घेतलेली. त्याचवेळी चहलच्या जागी बिश्नोईचा फिरकी विभागात समावेश करण्यात आला होता.
आवेश खानने वेस्ट इंडिजविरुद्धच्या टी२० मालिकेतून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेतील त्याच्या कामगिरीचे सर्वांनी कौतुक केले. आवेश खानला कर्णधार रोहित शर्मा आणि प्रशिक्षक राहुल द्रविड यांचा पाठिंबा मिळायला हवा, असे मत भारताचा माजी वेगवान गोलंदाज इरफान पठाण याने व्यक्त केले. माजी कर्णधार विराट कोहलीकडून मिळालेल्या पाठिंब्यामुळे मोहम्मद सिराज यशस्वी झाला, असेही तो पुढे म्हणाला.
“जेव्हा तुमचा दिवस वाईट असतो, तेव्हा संघ व्यवस्थापन आणि कर्णधाराने तुम्हाला साथ देणे गरजेचे असते. जेव्हा आपण मोहम्मद सिराजबद्दल बोलतो तेव्हा विराट कोहलीने त्याला खूप पाठिंबा दिला. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सिराज गोलंदाजी करतो याचे श्रेय विराट कोहलीला द्यायला हवे. खेळाडूंना पाठिंब्याची गरज असते आणि म्हणूनच आवेश खानला सिराजसारखाच पाठिंबा मिळायला हवा. कारण त्याच्यात ती प्रतिभा आहे.” असे पठाण म्हणाला.
महत्वाच्या बातम्या-
निव्वळ अविश्वसनीय! विल यंगने टिपलेला झेल पाहून तुम्हीही असेच म्हणाल (mahasports.in)






