इंग्लंड दौऱ्यासोबत शुबमन गिलने (Shubman gill) भारतीय कर्णधार म्हणून आपल्या प्रवासाची सुरुवात केली आहे. ही मालिका गिलच्या महान नेतृत्व कारकिर्दीची पायाभरणी ठरू शकते, पण हाच दौरा गौतम गंभीरसाठी (Gautam Gambhir) नुकसानकारक ठरू शकतो.
खरं तर इंग्लंड क्रिकेट संघाचे माजी कर्णधार मायकेल ॲथरटन (Micheal Atherton) यांचं मत आहे की, जर भारत इंग्लंडविरुद्ध ही मालिका हरतो, तर प्रमुख प्रशिक्षक गौतम गंभीर मोठ्या दबावाखाली येतील. गंभीर यांच्या प्रशिक्षकपदाखाली भारताला याआधी ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडविरुद्ध पराभवांचा सामना करावा लागला आहे.
स्काय स्पोर्ट्सवरील चर्चेत मायकेल ॲथरटन म्हणाले,
भारत सलग दोन कसोटी मालिकांमध्ये पराभूत झाला आहे. त्यांना घरच्या मैदानावर न्यूझीलंडकडून 3-0 ने हार स्वीकारावी लागली, त्यानंतर बॉर्डर-गावसकर ट्रॉफी 3-1 ने गमावली. आता जर इंग्लंडविरुद्धही त्यांना पराभव पत्करावा लागला, तर प्रशिक्षक म्हणून गौतम गंभीर जबरदस्त दबावात येतील.
ॲथरटन पुढे म्हणाले की, भारतीय क्रिकेट संघाकडे असलेल्या संसाधनांच्या तुलनेत, भारतातील लोक ही अपेक्षा करतात की जेव्हा त्यांची टीम मैदानात उतरेल, तेव्हा विजय मिळवूनच परत यायला हवी. इंग्लंडच्या माजी कर्णधारांच्या मते, सलग तीन टेस्ट मालिका हरल्यामुळे निश्चितच गंभीर यांच्या अडचणी वाढू शकतात.
इंग्लंडविरुद्ध चालू मालिकेआधी, गंभीर प्रशिक्षक बनल्यानंतर भारताने आतापर्यंत तीन कसोटी मालिकांमध्ये भाग घेतला आहे. त्यापैकी भारत फक्त बांगलादेशविरुद्धच विजय मिळवू शकला. पण त्यानंतर ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडकडून टीम इंडियाला पराभव स्विकारावा लागला.
सध्या इंग्लंडमध्येही भारतीय संघ फारफारतर मालिकेचा ड्रॉ साधू शकेल, असं चित्र आहे. मात्र गंभीर यांच्या कोचिंगखाली भारताच्या व्हाइट बॉल टी20 आणि वनडे संघांनी प्रभावी कामगिरी केली आहे. गंभीर कोच झाल्यानंतर भारताने एकही टी20 मालिका हरलेली नाही आणि ODI फॉरमॅटमध्ये चॅम्पियन्स ट्रॉफीही जिंकली आहे.






