भारत विरुद्ध इंग्लंड संघात सध्या सुरु असलेल्या ४ सामन्यांच्या कसोटी मालिकेतील तिसरा सामना २४ फेब्रुवारपासून सुरु होणार आहे. हा सामना अहमदाबादच्या सरदार वल्लभभाई पटेल स्टेडियमवर (मोटेरा स्टेडियम) पार पडणार आहे. हा सामना भारताचा वेगवान गोलंदाज इशांत शर्मासाठीही खास ठरु शकतो. कारण या सामन्यात त्याला एक मोठा विक्रम करण्याची संधी आहे.
इशांतला या सामन्यासाठी अंतिम ११ जणांच्या संघात खेळण्याची संधी मिळाली तर हा त्याचा कसोटी कारकिर्दीतील १०० वा कसोटी सामना ठरणार आहे. तसेच तो जर या सामन्यात खेळला तर १०० कसोटी सामने खेळणारा तो भारताचा ११ वा खेळाडू ठरेल. त्याचबरोबर भारताचा कपिल देव यांच्यानंतरचा दुसराच वेगवान गोलंदाज ठरेल. आत्तापर्यंत भारताच्या वेगवान गोलंदाजांमध्ये केवळ कपिल देव यांनाच १०० पेक्षा अधिक कसोटी सामने खेळता आले आहेत. त्यांनी १३१ कसोटी सामने खेळले आहेत.
इशांत कारकिर्द –
इशांतने त्याच्या कसोटी कारकिर्दीत ९९ कसोटी सामने खेळले आहेत. या ९९ सामन्यात त्याने ३०२ विकेट्स घेतल्या आहेत. यात त्याने ११ वेळा एका डावात ५ विकेट्स घेण्याचा कारनामा केला आहे. तसेच १ वेळा सामन्यात १० विकेट्स घेण्याची कारनामा केला आहे. याशिवाय इशांतने ८० वनडे सामने खेळताना ११५ विकेट्स आणि १४ आंतरराष्ट्रीय टी२० सामने खेळताना ८ विकेट्स घेतल्या आहेत.
भारतात होणार दुसरा दिवस-रात्र कसोटी सामना –
भारत आणि इंग्लंड संघात होणारा तिसरा कसोटी सामना हा दिवस-रात्र कसोटी सामना असणार आहे. भारतातील हा दुसराच दिवस-रात्र कसोटी सामना आहे. याआधी कोलकाताच्या इडन गार्डन या स्टेडियमवर पहिल्यांदा भारत विरुद्ध बांगलादेश संघात दिवस-रात्र कसोटी सामना खेळवण्यात आला होता.
तसेच भारतीय संघाचा हा एकूण तिसरा दिवस-रात्र कसोटी सामना असणार आहे. याआधी भारताने ऑस्ट्रेलियामध्ये ऍडलेड येथे देखील दिवस-रात्र कसोटी सामना खेळला आहे. तर इंग्लंड संघाचा हा एकूण चौथा दिवस-रात्र कसोटी सामना असेल. या सामन्याला २४ मार्चला भारतीय प्रमाणवेळेनुसार दुपारी २.३० वाजता सुरुवात होईल.
भारताकडून सर्वाधिक कसोटी सामने खेळलेले क्रिकेटपटू –
२०० – सचिन तेंडुलकर
१६३ – राहुल द्रविड
१३४ – व्हीव्हीएस लक्ष्मण
१३२ – अनिल कुंबळे
१३१ – कपिल देव
१२५ – सुनील गावसकर
११६ – दिलीप वेंगसरकर
११३ – सौरव गांगुली
१०३ – विरेंद्र सेहवाग
१०३ – हरभजन सिंग
९९ – मोहम्मद अझरुद्दीन
९९ – इशांत शर्मा
महत्त्वाच्या बातम्या –
तेवतिया ऑन फायर!! एकदिवसापूर्वीच टीम इंडियात निवड झालेल्या राहुलची ६ षटकारासह ताबडतोड खेळी
रसेल, पूरनसह ‘हा’ भारतीय क्रिकेटपटू गेलच्या ड्रीम टीममध्ये, सांगितले समावेशाचे कारण
भारतीय संघात निवड झाल्यानंतर सुर्यकुमारची आली पहिली प्रतिक्रिया; म्हणाला, ‘ही भावना…’