लवकरच भारतीय संघ इंग्लंड दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यावर त्यांना १८ ते २२ जून दरम्यान न्यूझीलंडविरुद्ध कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना आणि ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये इंग्लंडविरुद्ध कसोटी मालिका खेळायची आहे. या मोठ्या दौऱ्यासाठी बीसीसीआयने फार पुर्वीच भारतीय कसोटी संघाची घोषणा केली आहे. या संघामध्ये भारताचा युवा सलामीवीर पृथ्वी शॉ याची निवड करण्यात आली नाही.
मागील ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर सपशेल फ्लॉप ठरलेल्या या फलंदाजाने दमदार पुनरागमन करत देशांतर्गत क्रिकेटमध्ये शानदार प्रदर्सन केले. हीच लय कायम राखत त्याने आयपीएल २०२१ मध्ये धुमाकूळ घातला.
अशा प्रदर्शनानंतर निवडीचा प्रबळ दावेदार असलेल्या पृथ्वीला दुर्लक्षित केल्याने अनेकांनी प्रश्न उपस्थित केले आहेत. यात उडी घेत भारतीय संघाचे माजी निवडकर्ता सरनदीप सिंग यांनीही त्याला पाठिंबा दर्शवला आहे. पृथ्वीमध्ये अफाट प्रतिभा असून त्याच्यावर विश्वास ठेवणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले आहे.
सरनदीप म्हणाले की, “पृथ्वीमध्ये ती क्षमता आहे, जी भारतीय संघासाठी विरेंद्र सेहवागमध्ये होती. तुम्ही त्याला एवढ्या लवकर दुर्लक्षित करु शकत नाही. त्याने ऑस्ट्रेलिया दौऱ्यातून बाहेर झाल्यानंतर देशांतर्गत क्रिकेटमध्ये खूप धावा चोपल्या आहेत. त्याने स्वत:मधील तांत्रित उणीवांमध्येही सुधारणा केली आहे. याचा नमुना आयपीएलमध्ये सर्वांना दिसला आहे. भारतीय संघ व्यवस्थापनाने पृथ्वीसारख्या प्रतिभाशाली खेळाडूचे समर्थन केले पाहिजे.”
पृथ्वीने विजय हजारे ट्रॉफीमध्ये धावांचा पाऊस पाडला होता. त्याने या हंगामात ८०० हून अधिक धावा कुटल्या होत्या. हाच फॉर्म कायम राखत तो आयपीएल २०२१ मध्ये झळकला होता. दिल्ली कॅपिटल्सचे प्रतिनिधित्त्व करताना अवघ्या ८ सामन्यात त्याने ३०८ धावा चोपल्या आहेत. यात त्याच्या ३ अर्धशतकांचा समावेश आहे. तसेच ८२ धावा ही त्याची सर्वोच्च वैयक्तिक खेळी राहिली आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
भारताविरुद्धच्या कसोटी मालिकेपुर्वी इंग्लंडच्या ‘या’ गोलंदाजाचा आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा
मॅन विथ गोल्डन हार्ट! ‘धन्यवाद अण्णा, तू एक जीव वाचवलास’; मध्यरात्री पिडीताच्या मदतीला धावला विहारी
आयपीएल २०२१च्या उर्वरित हंगामावर टांगती तलवार? पाहा काय म्हणाले राजस्थान रॉयल्सचे संघमालक