कल्याण। होतकरू मित्र मंडळ, जय बजरंग मंडळ व जय खंडोबा यांनी जय शंकर क्रीडा मंडळ आयोजित अनुक्रमे महिला, अ गट व ब गटाचे विजेतेपद मिळविले. होतकरूची चैताली बोराडेला महिलांत, तर जय बजरंगचा राजू कथोरेला पुरुष अ गटात स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू ठरले. कोळसेवाडी कल्याण येथील कर्मवीर दादासाहेब गायकवाड क्रीडांगणावर संपन्न झालेल्या या स्पर्धेतील महिलांच्या अंतिम सामन्यात होतकरूने शिवतेजचा प्रतिकार ३८-३५ असा मोडून काढत रोख रु.पंधरा हजार(₹१५,०००/-) व विजेतेपदाचा चषक आपल्याकडे खेचून आणला. पराभूत शिवतेज संघाला चषक व रोख रु. दहा हजार(₹१०,०००/-) वर समाधान मानावे लागले.
ठाण्यातील दोन तुल्यबळ संघात झालेल्या या लढतीत पूर्वार्धात शिवतेजच्या निकिता म्हात्रे, माधुरी गवंडी यांनी जोरकस खेळ करीत आपल्या संघाला २५-१९ अशी आघाडी मिळवून दिली होती. पण उत्तरार्धात त्यांच्या खेळात तो जोश दिसला नाही. उत्तरार्धात होतकरूच्या चैताली बोराडे, ऐश्वर्या राऊत यांना सूर सापडल्याने त्यांनी आपल्या संघाला भराभर गुण मिळवून देत विजय साकारला.
पुरुषांच्या अ गटातील अंतिम सामन्यात वासिंदच्या जय बजरंगने डोंबिवलीच्या छत्रपती शिवाजी मंडळाचे आव्हान ३१-१६ असे सहज संपुष्टात आणत विजेतेपदाचा चषक व रोख रु. पंचवीस हजार(₹२५,०००/-)आपल्या खात्यात जमा केले. उपविजेत्या छत्रपतीला चषक व रोख रु. पंधरा हजार(₹१५,०००/-) समाधान मानावे लागले.
जय बजरंगने सुरुवातीपासूनच आक्रमक खेळ करीत प्रतिस्पर्ध्यावर दबाव वाढविला. मध्यांतराला खेळ थांबला तेव्हा २३-०६ अशी भक्कम आघाडी जय बजरंगकडे होती. उत्तरार्धात मात्र सावध खेळ करीत आपल्या विजयावर शिक्कामोर्तब केले. मध्यांतरापर्यंत छत्रपतीला दोन अंकी गुणसंख्या देखील गाठणे जमले नव्हते. राजू कथोरेच्या भन्नाट चढाया त्याला अतुल दिसले, मिलिंद दिनकर यांची मिळालेली पकडीची भक्कम साथ या मुळे हा विजय सोपा झाला. छत्रपतींच्या समीर बाईत, अजिंक्य पाटील यांचा या सामन्यात प्रभाव पडला नाही.
पुरुषांच्या ब गटाच्या अंतिम सामन्यात जय खंडोबाने स्व.आकाशचा विरोध ३९-२३ असा संपवित विजेत्या चषका बरोबरच रोख रु. वीस हजार(₹२०,०००/-) आपल्या नावे केले. उपविजेत्या संघाला चषक व रोख रु.पंधरा हजार(₹१५,०००/-)वर संतुष्ट व्हावे लागले. निलेश व परेश या धुमाळ बंधुना या विजयाचे श्रेय जाते. स्व.आकाश कडून जयेश व योगेश हे पाटील बंधू बऱ्यापैकी खेळले.
या अगोदर झालेल्या महिलांच्या उपांत्य सामन्यात होतकरूने ज्ञानशक्तीचा ३०-२८ असा, तर शिवतेजने संकल्पला ५०-३२ असे नमवित अंतिम फेरी गाठली. पुरुषांच्या अ गटात जय बजरंगने हुतात्मा शांतारामला २३-१८ असे, तर छत्रपती शिवाजीने नवी मुंबई प्रशिक्षण केंद्राला ३१-१४ असे पराभुत करीत अंतिम फेरी गाठली. पुरुष ब गटात जय खंडोबाने आई गावदेवीवर ५०-३२असा, तर स्व.आकाश संघाने जय बजरंगवर ३७-३१ असा विजय मिळवीत अंतिम फेरीत धडक दिली होती. सर्व गटातील उपांत्य उपविजयी संघाना देखील चषक व रोख रक्कम देऊन सन्मानित करण्यात आले.
महत्त्वाच्या बातम्या –
मुंबई शहर कबड्डी कुमार गट जिल्हा अजिंक्यपद निवड चाचणी: शिवशक्ती महिला संघ कुमारी गटात अंतिम विजेता
भयानक.! भारताच्या आंतरराष्ट्रीय कबड्डीपटूची गोळ्या झाडून हत्या