टी२० विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघाचे सुपर १२ सामन्यात अतिशय सुमार दर्जाचे प्रदर्शन राहिले आहे. यामुळे भारतीय संघावर चाहत्यांसोबत क्रिकेट विश्लेषकांनी देखील ताशेरे ओढले आहे. टी-२० विश्वचषकातील खराब कामगिरीमुळे विराट कोहलीच्या कर्णधारपदावर आणि संघ निवडीवर देखील प्रश्न उपस्थित केले जात आहेत. अशातच, भारतीय क्रिकेट संघातील मोठ्या नावांवर अवलंबून न राहता बीसीसीआयने आता तरुणांना अधिक संधी देण्याचा विचार करायला हवा, असे मत भारताचे माजी कर्णधार कपिल देव यांनी व्यक्त केले आहे.
कपिल देव यांचे हे विधान न्यूझीलंड संघाविरुद्ध भारताच्या पराभवानंतर आले आहे. याआधी पाकिस्तान संघानेही भारताचा १० गडी राखून पराभव केला होता. हे दोन सामने गमावल्यानंतर उपांत्य फेरी गाठण्याच्या भारताच्या आशा धूसर झाल्या आहेत.
कपिल देव एका वृत्तवाहिनीशी बोलतांना म्हणाले की, ‘जर भारतीय संघ इतर संघांच्या जोरावर यशस्वी झाला, तर ती कौतुकास्पद गोष्ट नाही. जर भारतीय संघाला विश्वचषक जिंकायचा असेल किंवा उपांत्य फेरी गाठायची असेल, तर तुम्हाला ते स्वबळावरच लढावे लागेल. इतर संघांवर अवलंबून न राहणे चांगले. मला वाटतं, निवडकर्त्यांनी मोठी नावे आणि मोठ्या खेळाडूंचे भविष्य ठरवण्याची वेळ आली आहे.’
सध्याच्या टी२० विश्वचषकात भारताच्या खराब कामगिरीमागे अनेक कारणे असू शकतात. बायो-बबल, सततच्या क्रिकेटमुळे येणारा थकवा आणि संघ निवड ही तीन प्रमुख कारणे असू शकतात. तसे असेल तर आयपीएलमध्ये चांगली कामगिरी करणारे आणि तंदुरुस्त असलेले अनेक युवा खेळाडू आहेत, असे कपिल देव यांचे मत आहे. अशा खेळाडूंकडे भारतीय क्रिकेटचे भविष्य म्हणून पाहिले जाऊ शकते.
माजी भारतीय कर्णधार पुढे म्हणाले की, ‘आता आयपीएलमध्ये चांगली कामगिरी करणाऱ्या तरुणांना संधी देण्याची वेळ आली आहे, बीसीसीआयने याचा विचार करण्याची गरज आहे. आपण पुढची पिढी कशी चांगली बनवू शकतो? ते हरले तर त्यात काही गैर नाही. कारण त्यांना अनुभव तर मिळेल. जर मोठे खेळाडू चांगले क्रिकेट खेळत नसतील आणि असेच वाईट क्रिकेट खेळत राहिले, तर त्यावर बरीच टीका होणार आहे. मला वाटते की बीसीसीआयने हस्तक्षेप करून अधिक तरुणांना संघात घेण्याचा विचार केला पाहिजे.’
महत्त्वाच्या बातम्या –
एकमेवाद्वितीय विराट! बनला क्रिकेट इतिहासातील आजवरचा सर्वात यशस्वी कर्णधार
‘द वॉल’ राहुल द्रविड का ठरु शकतो भारतीय क्रिकेट संघाचा उत्तम प्रशिक्षक, वाचा ३ प्रमुख कारणे