संयुक्त अरब अमिराती (यूएई) येथे सुरु असलेल्या टी२० विश्वचषकात बुधवारी (३ नोव्हेंबर) दुसऱ्या सामन्यात ब गटातील भारत आणि अफगानिस्तान हे संघ आमने-सामने आले. अबुधाबी येथील शेख झायेद क्रिकेट स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात भारताने अफगाणिस्तानचा ६६ धावांनी दणदणीत पराभव केला. या विजयासह भारतीय कर्णधार विराट कोहलीच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला.
अशी कामगिरी करणारा एकमेव कर्णधार विराट
विराट कोहलीचा कर्णधार म्हणून आंतरराष्ट्रीय टी२० क्रिकेटमधील ३० वा विजय ठरला. यासह विराट क्रिकेटच्या तिन्ही प्रकारात कर्णधार म्हणून ३० पेक्षा जास्त विजय मिळवणारा एकमेव कर्णधार बनला. त्याच्या नावावर आता कर्णधार म्हणून वनडे क्रिकेटमध्ये ६५, कसोटी क्रिकेटमध्ये ३८ व टी२० क्रिकेटमध्ये ३० विजय जमा झाले आहेत. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आतापर्यंत ६ कर्णधारांनी कसोटीमध्ये, ४१ कर्णधारांनी वनडेमध्ये व चार कर्णधारांनी टी२० मध्ये ३० किंवा त्यापेक्षा अधिक विजय मिळवले आहेत.
भारतीय संघाचा पहिला विजय
पहिले दोन सामने गमावल्यानंतर विजयाच्या इराद्याने मैदानात उतरलेल्या भारतीय संघासाठी रोहित शर्मा व केएल राहुल यांनी जबरदस्त सलामी दिली. अफगाणिस्तानच्या गोलंदाजांची पिसे काढत या दोघांनी १४.४ षटकात १४० धावा फटकावल्या. राहुलने ६९ तर रोहितने ७४ धावांची खेळी केली. अखेरीस हार्दिक पंड्या व रिषभ पंत यांनी अवघ्या २१ चेंडूत ५३ धावांची भागीदारी केली. हार्दिक ३५ व पंत २७ धावांवर नाबाद राहिला.
प्रत्युत्तरात, मोहम्मद शमी व जसप्रीत बुमराह यांनी अफगाणिस्तानचे दोन्ही सलामीवीर झटपट तंबूत पाठवले. त्यानंतर चार वर्षानंतर पुनरागमन करणाऱ्या रविचंद्रन अश्विनने आपल्या चार षटकांत केवळ १४ धावा देऊन दोन बळी मिळवले. कर्णधार मोहम्मद नबीच्या ३५ व करीम जनतच्या नाबाद ४२ अफगाणिस्तानच्या विजयासाठी तोकड्या पडल्या. भारतासाठी मोहम्मद शमीने सर्वाधिक तीन बळी मिळविले. रोहित शर्माला त्याच्या अर्धशतकी खेळीसाठी सामनावीर पुरस्कार देण्यात आला.
महत्त्वाच्या बातम्या-
‘द वॉल’ राहुल द्रविड का ठरु शकतो भारतीय क्रिकेट संघाचा उत्तम प्रशिक्षक, वाचा ३ प्रमुख कारणे
द्रविड टीम इंडियाचे २६ वे महागुरू, आतापर्यंत ‘या’ दिग्गजांची लागलीय वर्णी; वाचा संपूर्ण यादी