रविचंद्रन अश्विनसारख्या प्रतिभावान गोलंदाजाला कसोटी संघाच्या प्लेइंग इलेव्हनमधून वगळले जाऊ शकते, तर दीर्घकाळ फॉर्मसोबत झुंजणाऱ्या विराट कोहलीला वगळणे ही फार मोठी समस्या नाही, असे मत भारताचे माजी कर्णधार कपिल देव यांनी व्यक्त केले. कोहली जवळपास तीन वर्षांपासून मोठी खेळी खेळण्यासाठी झगडत आहे. भारताला पहिल्यांदाच विश्वविजेते बनवणाऱ्या अष्टपैलू कर्णधाराला असे वाटते की, उत्तम लयीत असलेल्या खेळाडूंना आपले कौशल्य दाखवण्यासाठी पुरेशी संधी न दिल्यास भारतीय संघ व्यवस्थापनावर अन्याय होईल.
कपिलने एबीपी न्यूजला सांगितले की, “जर तुम्ही कसोटीतील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वोत्तम गोलंदाज अश्विनला सोडू शकता, तर जगातील नंबर वन खेळाडूही बाहेर बसू शकतो. कोहलीने धावा कराव्यात अशी माझी इच्छा आहे, पण सध्या विराट कोहली आमच्या अपेक्षेनुसार खेळत नाही. त्याने आपल्या कामगिरीच्या जोरावर स्वतःचे नाव कमावले आहे आणि जर त्याने कामगिरी केली नाही तर आपण नवीन खेळाडूंना बाहेर ठेवू शकत नाही.”
भारताचा माजी कर्णधार म्हणाला की, “कोहली आणि युवा खेळाडूंमध्ये संघात स्थान मिळवण्यासाठी चांगली स्पर्धा व्हावी अशी माझी इच्छा आहे. मला वाटते की नवीन खेळाडूंनी अशा प्रकारे कामगिरी करावी की विराटसाठी गोष्टी कठीण आहेत आणि विराट अशा प्रकारे पुनरागमन करेल की नवीन खेळाडूंना त्यांची पातळी आणखी उंच करावी लागेल. मला दोघांमध्ये चांगली स्पर्धा हवी आहे. विराटने असा विचार करायला हवा की, तो एकेकाळी संघाचा अव्वल फलंदाज होता आणि त्याला या संघातही तेच करायचे आहे.”
कपिल म्हणाला की, “वेस्ट इंडिज दौऱ्यातील विराटची ‘विश्रांती’ त्याच्यासाठी संघाबाहेर जाण्याचा रस्ता आहे. तुम्हाला हवे असल्यास तुम्ही याला विश्रांती म्हणू शकता किंवा संघातून बाहेर काढू शकता. यावर प्रत्येकाचे स्वतःचे मत असू शकते. निवडकर्त्यांनी त्याची निवड केली नसेल, तर मोठे खेळाडू कामगिरी करत नसल्यामुळे असे होऊ शकते.”
कपिल म्हणाला की, “प्लेइंग इलेव्हनची निवड सध्याच्या फॉर्मच्या आधारावर केली पाहिजे, मागील कामगिरीच्या आधारावर नाही. जेव्हा तुमच्याकडे भरपूर पर्याय असतील, तेव्हा तालमीत असलेल्या खेळाडूंना संधी द्या. केवळ प्रतिष्ठेच्या जोरावर तुम्ही जाऊ शकत नाही. तुम्हाला विद्यमान फॉर्मच्या आधारे निवड करावी लागेल. तुम्ही प्रस्थापित खेळाडू असाल पण याचा अर्थ असा नाही की सलग पाच सामन्यांमध्ये खराब कामगिरी करूनही तुम्हाला संधी मिळेल.”
दरम्यान, भारताचा दिग्गज फलंदाज जवळपास गेल्या तीन वर्षांपासून आपल्या खराब फॉर्मविरुद्ध झुंजत आहे. एकेकेळी सचिनच्या शंभर शतकांचा विक्रम सहजपणे मोडेल असे वाटणारा विराट स्वत:च्या ७१व्या आंतरराष्ट्रीय शतकाची गेल्या बऱ्याच कालावधीपासून वाट पाहत आहे. त्यामुळे विराटला वारंवार संधी देणे म्हणजे चांगली प्रतिभा असणाऱ्या नविन खेळाडूंवर अन्याय करण्यासारखे आहे असे स्पष्ट मत कपिल देव याने मांडले आहे.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
रोहितने घेतलेल्या ‘त्या’ निर्णयाने सामना भारताच्या खिशात, खु्द्द भारतीय कर्णधारानेच केले स्पष्ट
आधी सीएसके अन् आता धोनी! जडेजाचं ‘ते’ वागणं चाहत्यांच्या जिव्हारी
टी२० ब्लास्टमध्ये ‘सॉल्ट ऍण्ड पेपर’चा तडका, पाहा दोन्ही खेळाडूंमधील मजेशीर लढत