करुण नायर आणि जितेश शर्मा या दोन आघाडीच्या खेळाडूंनी विदर्भ संघातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. दोघांनीही विदर्भसाठी गेल्या काही हंगामांमध्ये उल्लेखनीय कामगिरी केली होती. विदर्भने त्यांच्या साथीने रणजी ट्रॉफी जिंकली, विजय हजारे ट्रॉफीमध्ये उपविजेतेपद मिळवले आणि सय्यद मुश्ताक अली टी20 स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीपर्यंत मजल मारली होती.
क्रिकबझच्या अहवालानुसार, करुण नायर पुन्हा एकदा कर्नाटकच्या संघात खेळण्याचा विचार करत आहे. वैयक्तिक आणि कौटुंबिक कारणास्तव त्याने हा निर्णय घेतला आहे. नायरने 2024-25 रणजी ट्रॉफी हंगामात विदर्भसाठी सर्वाधिक 863 धावा केल्या, ज्यामध्ये चार शतकांचा समावेश होता. विजय हजारे स्पर्धेतही त्यांनी 779 धावा केल्या होत्या. यामुळेच त्याच्या उत्तम फॉर्ममुळे त्याची तब्बल 8 वर्षांनी भारतीय कसोटी संघात पुनरागमन झाले आहे. इंग्लंड दौऱ्यासाठी तो निवडला गेला आहे. त्याने आतापर्यंत 6 कसोटींमध्ये 374 धावा केल्या असून एका सामन्यात त्रिशतक झळकावले आहे.
दुसरीकडे, जितेश शर्मा आता बडोदा संघात सहभागी होणार आहे. त्याने विदर्भसाठी सय्यद मुश्ताक अली स्पर्धेत कर्णधारपद भूषवले होते आणि विजय हजारे ट्रॉफीतसुद्धा महत्वाची भूमिका बजावली होती. त्यानंतर आयपीएल 2025 मध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूसाठी (RCB) जबरदस्त कामगिरी करत संघाला विजेतेपद मिळवून दिले. लिस्ट-ए क्रिकेटमध्ये त्याच्या नावावर 56 सामन्यांत 1533 धावा आणि दोन शतके आहेत, तर फर्स्ट क्लासमध्ये 661 धावा नोंदवल्या आहेत.






