कोलकाता नाईट रायडर्स (केकेआर) संघाने आपल्या आयपीएल 2021 सत्राची सुरुवात सनरायझर्स हैदराबाद संघावर विजय मिळवून केली. चेन्नई येथे झालेल्या त्यांच्या पहिल्या आयपीएल सामन्यात केकेआरने सनरायझर्स हैदराबादला 10 धावांनी पराभूत केले. या सामन्यात हरभजन सिंगने केकेआरकडून खेळताना डावाचे पहिले षटक टाकले. परंतु त्यानंतर त्याला एकही षटक फेकण्याची संधी मिळाली नाही.
सामन्यानंतर कर्णधार ऑयन मॉर्गन याने भज्जीला पुन्हा गोलंदाजी न देण्याबाबतचे कारण सांगितले आहे. भज्जीला चेन्नई सुपर किंग्जने सोडल्यानंतर यंदाच्या आयपीएल लिलावात केकेआरने आधारभूत किंमतीवर त्याला विकत घेतले.
केकेआर संघाकडून खेळत असलेल्या भज्जीला या सामन्यात केवळ एकच षटक फेकण्याची संधी मिळाली. यावर कर्णधार मॉर्गन म्हणाला की, “हरभजनने पहिल्या षटकात चांगली गोलंदाजी केली, परंतु नंतर आम्ही त्याच्याकडून गोलंदाजी करवू शकलो नाही. पण त्याच्या अनुभवाचा उपयोग आम्ही इतरांना सल्ला देण्यासाठी केला.”
भज्जीने आपल्या पहिल्या षटकात एका षटकारासह एकूण आठ धावा दिल्या. याव्यतिरिक्त, त्याने त्याच्या षटकातील चौथ्या चेंडूवर डेविड वॉर्नरला तंबूचा मार्ग दाखविला असता, परंतु पॅट कमिन्सने त्याचा झेल सोडला. त्यामुळे वॉर्नरला पहिल्याच षटकात जिवनदान मिळाले.
सहा गोलंदाजांकडून गोलंदाजी करवताना केकेआरने भज्जीला केवळ एकच षटक दिले. त्यामध्ये आंद्रे रसेलने तीन, तर प्रसिद्ध कृष्णा, शाकिब अल हसन, पॅट कमिन्स आणि वरुण चक्रवर्ती यांनी प्रत्येकी चार षटके टाकली. या सामन्याबद्दल बोलताना केकेआरने प्रथम फलंदाजी करताना सहा गड्यांच्या मोबदल्यात 187 धावा केल्या. प्रत्युत्तरात सनरायझर्स हैदराबादला 20 षटकांत पाच गड्यांच्या मोबदल्यात 177 धावा करता आल्या. केकेआरकडून नितीश राणाने सर्वाधिक 80 धावांची खेळी केली त्यासाठी त्याला ‘सामनावीर’ म्हणून घोषित करण्यात आले.
महत्त्वाच्या बातम्या-
नितीश राणाचा नवा पॅटर्न! अर्धशतक झळकावताच केले आगळेवेगळे सेलिब्रेशन, सोशल मीडियावर एकच चर्चा