भारताचा सलामीवीर यशस्वी जायसवाल स्थानिक क्रिकेटमध्ये मुंबईकडून खेळतो. सध्या देशांतर्गत क्रिकेटमध्ये रणजी ट्रॉफी २०२५-२६चे सामने सुरू आहेत. या स्पर्धेच्या शेवटच्या टप्प्यासाठी मुंबईने संघ निवडला असून त्याला यामध्ये स्थान दिले गेले नाही. त्याच्यावर एवढी कडक कारवाई का केली गेली ते पाहू.
स्पर्धेसाठी संघ निवडण्यसाठी मुंबई क्रिकेट संघाची बैठक झाली. त्यामध्ये जायसवालला संघातून काढण्याचा निर्णय घेतला गेला. तो सध्या भारताच्या टी२० संघाचा भाग नाही. यामुळे त्याचा न्यूझीलंडविरुद्धची टी२० मालिका आणि टी२० विश्वचषक २०२६मध्ये सहभाग नाही. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या नियमानुसार जो खेळाडू आंतरराष्ट्रीय सामने खेळत नाही, त्याने स्थानिक क्रिकेटमध्ये खेळणे आवश्यक आहे.
जायसवालच्या उपलब्धतेबाबत मुंबई क्रिकेट असोसिएशनचे (एमसीए) अधिकारी म्हणाले, “आम्ही त्याला काही सामन्यांसाठी विचारले होते, मात्र त्याच्याकडून काहीच उत्तर आले नाही. हैद्राबादविरुद्ध संघ निवडण्याआधी असे वाटले की तो निवडकच सामने खेळतो.”
“आम्ही मागील सामन्यासाठी त्याचबरोबर पुढील सामन्यासाठी संघ निवडण्याआधी त्याच्याशी संपर्क केला होता, मात्र त्याने काही उत्तर दिले नाही. यामुळे त्याला दिल्लीविरुद्धच्या सामन्यासाठी त्याला संघात घेतले नाही”, असेही ते अधिकारी पुढे म्हणाले.
जायसवाल रणजी ट्रॉफीच्या या हंगामात एकच सामना खेळला. त्याने जयपूरमध्ये राजस्थानविरुद्ध ६७ आणि १५६ धावा केल्या होत्या. त्याने सय्यद मुश्ताक अली आणि विजय हजारे ट्रॉफीचे प्रत्येकी ३-३ सामने खेळले आहेत. शार्दुल ठाकुर दुखापतग्रस्त असल्याने सिद्धेश लाड मुंबईचे नेतृत्व करणार आहे.
या स्पर्धेत मुंबईने सहा सामन्यात चार विजय आणि दोन अनिर्णीत निकालानंतर एलीट ग्रुप डीच्या गुणतालिकेत पहिल्या स्थानावर आहे. २९ जानेवारीपासून मुंबई विरुद्ध दिल्ली सामना खेळला जाणार आहे. वानखेडे स्टेडियमवर ७ फेब्रुवारीला टी२० विश्वचषकातील भारत विरुद्ध अमेरिका सामना खेळला जाणार आहे. यामुळे मुंबईचा हा सामना बीकेसीच्या स्टेडियमवर होणार आहे.
मुंबईचा संघ– सिद्धेश लाड (कर्णधार), मुशीर खान, अखिल हेरवाडकर, सुवेद पारकर, सरफराज खान, आकाश आनंद (विकेटकीपर), हार्दिक तामोरे (विकेटकीपर), सूर्यांश शेडगे, साईराज पाटील, शम्स मुलाणी, हिमांशु सिंग, तुषार देशपांडे, मोहित अवस्थी, ओकांर तरमाळे, सिल्वेस्टर डिसोजा






