---Advertisement---

विश्वचषकाची फायनल अन् त्या नवरा-बायकोची मॅचविनिंग कामगिरी

---Advertisement---

मेलबर्न। आज(८ मार्च) जागतिक महिला दिनाच्या दिवशी महिला टी२० विश्वचषकाचा अंतिम सामना भारतीय महिला संघ विरुद्ध ऑस्ट्रेलिया महिला संघात पार पडला. मेलबर्न क्रिकेट ग्राऊंडवर पार पडलेला हा सामना ऑस्ट्रेलियाने ८५ धावांनी जिंकला आणि ५ व्यांदा टी२० विश्वचषकावर नाव कोरले.

ऑस्ट्रेलियाच्या या विजयात यष्टीरक्षक फलंदाज एलिसा हिलीने तुफानी अर्धशतकी खेळी करत महत्त्वाचा वाटा उचलला. तिने 39 चेंडूत 75 धावा केल्या. तिच्या या कामगिरीमुळे तिला सामन्यातील सर्वोत्तम खेळाडूचा पुरस्कारही मिळाला.

विशेष म्हणजे हिलीचा पती आणि ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज मिशेल स्टार्कने २०१५ ला ऑस्ट्रेलिया पुरुष संघाने विजेतेपद मिळवलेल्या ५० षटकांच्या विश्वचषकात महत्त्वाचा वाटा उचलला होता. त्यावेळीही अंतिम सामना मेलबर्न क्रिकेट ग्राऊंडवर पार पडला होता.

न्यूझीलंड विरुद्ध पार पडलेल्या या अंतिम सामन्यात स्टार्कने २ विकेट्स घेतल्या होत्या. त्यामुळे तो त्या विश्वचषकात सर्वाधिक विकेट्स घेणारा गोलंदाज ठरला होता. त्याने या विश्वचषकात २२ विकेट्स घेताना अंतिम सामन्यानंतर मालिकावीराचा पुरस्कार मिळवला होता.

त्यामुळे एकाच मैदानात विश्वचषकाचा अंतिम सामना खेळल्यानंतर महत्त्वाचे २ पुरस्कार मिळवणारे हे पहिलेच दाम्पत्य ठरले आहे.

आणखी एक खास गोष्ट म्हणजे २०१८ ला पार पडलेल्या महिला टी२० विश्वचषकाचा सर्वोत्कृष्ट खेळाडूचा पुरस्कार हिलीलाच मिळाला होता. त्यामुळे क्रिकेट विश्वचषकातील सर्वोत्कृष्ठ खेळाडूचा पुरस्कार मिळवणारी ही पहिलीच पती-पत्नीची जोडी ठरली होती.

त्या दोघांनी 2015ला लग्न केले आहे. स्टार्क आजचा सामना पाहण्यासाठी दक्षिण आफ्रिका दौऱ्यावरुन लवकर ऑस्ट्रेलियाला परतला होता. यासाठी त्याने दक्षिण आफ्रिकेविरुद्धचा तिसरा वनडे सामनाही खेळला नाही.

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---