ऑकलंड। महिला विश्वचषक २०२२ स्पर्धेत शनिवारी (१९ मार्च) १८ वा सामना भारतीय महिला विरुद्ध ऑस्ट्रेलिया महिला संघात पार पडला. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने ६ विकेट्सने विजय मिळवला. या विजयासह भारतीय संघाने उपांत्य फेरीचे तिकीट पक्के केले आहे. मात्र, भारतीय संघाचा हा या विश्वचषकातील ५ सामन्यांमधील तिसरा पराभव ठरला. त्यामुळे भारतासमोरील पुढील मार्ग कठीण बनला आहे. यावर आता भारतीय संघाची कर्णधार मिताली राज हिने प्रतिक्रिया दिली आहे.
भारताने या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना ७ बाद २७७ धावा केल्या होत्या. त्यानंतर ऑस्ट्रेलियाने अखेरच्या षटकात ४ विकेट्सच्या मोबदल्यात २८० धावा करत सामना जिंकला आणि या स्पर्धेतील आपला सलग ५ वा विजय मिळवला.
या सामन्यातील पराभवासाठी मिताली राजने गोलंदाज आणि क्षेत्ररक्षकांच्या कामगिरीला जबाबदार ठरवले आहे. मिताली म्हणाली, ‘जेव्हा तुम्ही पराभूत होता, तेव्हा नेहमीच वाटते की १०-१५ धावा कमी पडल्या. ऑस्ट्रेलियाने चांगली सुरुवात केली. त्यांचा संघ आमच्या पुढे राहिला. आमच्या क्षेत्ररक्षकांनी गरज असताना गोलंदाजांना साथ दिली नाही. हा दिवस असा होता की, आमची गोलंदाजी चालली नाही. आज फलंदाजी चांगली झाली, पण गोलंदाजांनी निराश केले.’
भारताला अजून साखळी फेरीतील दोन सामने खेळायचे आहेत. हे दोन्ही सामने भारतासाठी उपांत्य फेरीतील प्रवेशासाठी ‘करो वा मरो’ अशा स्थितीतील असणार आहेत. याबद्दल मिताली म्हणाली, ‘पुढील दोन सामने खूप महत्त्वाचे झाले आहेत. आम्ही प्रत्येक विभागात चांगली कामगिरी करण्याचा प्रयत्न करू. आम्हीच आम्हाला या स्थितीत घेऊन आलो आहोत, पण आमच्यासाठी पुढील दोन्ही सामने जिंकणे महत्त्वाचे झाले आहेत.’
झुलन गोस्वामीचे कौतुक
ऑस्ट्रेलियाविरुद्धचा सामना वेगवान गोलंदाज झुलन गोस्वामीचा कारकिर्दीतील २०० वा वनडे सामना होता. ती २०० किंवा त्यापेक्षा अधिक वनडे सामने खेळणारी मिताली राज नंतरची दुसरीच भारतीय महिला क्रिकेटपटू ठरली आहे. तिला तिच्या २०० व्या वनडे सामन्याची विशेष कॅपही मितालीनेच दिली.
तसेच सामन्यानंतर झुलनबद्दल मिताली म्हणाली, ‘ती इतक्या वर्षांपासून जो अनुभव संघात घेऊन येते, तो अविश्वसनीय आहे. एका गोलंदाजासाठी २०० सामने खेळणे खूप चांगली गोष्ट आहे. ती निश्चितच भारतातील अनेक मुलींसाठी आदर्श आहे.’
विशेष म्हणजे लवकरच झुलन गोस्वामीवर अधारित ‘चकदाह एक्सप्रेस’ नावाचा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात अभिनेत्री अनुष्का शर्मा झुलनची भूमिका निभावणार आहे.
भारताचे उर्वरित साखळी सामने
भारताला महिला विश्वचषक २०२२ स्पर्धेत आता बांगलादेश आणि दक्षिण आफ्रिका संघांविरुद्ध साखळी सामने खेळायचे आहेत. हे दोन्ही सामने अत्यंत महत्त्वाचे आहेत. बांगलादेशविरुद्ध २२ मार्च आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्ध २७ मार्च रोजी भारताला सामने खेळायचे आहेत.
महत्त्वाच्या बातम्या –
भारताच्या ‘या’ ३ फलंदाजांचा नादच खुळा! वनडे कारकिर्दीत एकही गोलंदाज घेऊ शकला नाही त्यांची विकेट
हैदराबाद-केरला ब्लास्टर्समध्ये आज फायनल; आयएसएलला मिळणार नवा विजेता