गेल्या काही महिन्यांपासून मोहम्मद सिराजने (Mohammad Siraj) भारतीय संघासाठी अप्रतिम कामगिरी केली आहे. वनडे, टी२० आणि कसोटी क्रिकेटमध्ये त्याने अनेकदा आपल्या गोलंदाजीच्या बळावर भारतीय संघाला सामने जिंकून दिले आहेत. तो सध्या प्रसिद्धीच्या शिखरावर आहे. परंतु त्याच्या कारकीर्दीतील सुरुवातीचा काळ खूप वाईट होता. निराशाजनक कामगिरीमुळे त्याला अनेकदा ट्रोल केले गेले होते. दरम्यान आता त्याने जुन्या आठवणींना उजाळा दिला आहे.
रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरच्या (Royal challengers Bangalore) पॉडकास्टमध्ये मोहम्मद सिराज म्हणाला की, “जेव्हा मी कोलकाता नाईट रायडर्स संघाविरुद्ध झालेल्या सामन्यात दोन बिमर चेंडू टाकले होते, त्यावेळी मला अनेकांनी म्हटले होते की, क्रिकेट सोड आणि वडिलांसोबत रिक्षा चालव. मला यासारख्या अनेक प्रतिक्रीया आल्या होत्या. लोकांना यामागे असलेला संघर्ष दिसून येत नव्हता. मला अजूनही आठवण आहे, ज्यावेळी माझी पहिल्यांदा निवड झाली होती. त्यावेळी माही भाईने ( एमएस धोनी) मला म्हटले होते की, “लोक जे म्हणताय त्या गोष्टींवर लक्ष केंद्रित करण्याची गरज नाहीये..”
“तुम्ही चांगलं कराल तर लोक तुमचं कौतुक करतील परंतु तुम्ही चांगली कामगिरी नाही केली तर ते शिवीगाळ देखील करतील. त्यामुळे या सर्व गोष्टींना गांभीर्याने घेऊ नकोस.” मोहम्मद सिराज पुढे म्हणाला की, “ज्या लोकांनी माझ्याविरुद्ध अपशब्दांचा वापर केला होता, तेच लोक मला स्वतःहून येऊन म्हणतात की, तू खूप चांगला गोलंदाज आहेस. मला माहित आहे की मला कोणाच्याही दृष्टीकोनाची गरज नाही. मी तोच सिराज आहे जो आधी होतो.”
मोहम्मद सिराजला ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर कसोटी मालिकेत पदार्पण करण्याची संधी मिळाली होती. या मालिकेत मोहम्मद सिराजने भारतीय संघाला विजय मिळवून देण्यात मोलाची भूमिका बजावली होती. तसेच याच दौऱ्यावर चांगली कामगिरी करून त्याने अनेकांची बोलती बंद केली होती.
महत्वाच्या बातम्या :
चॅम्पियन बनणे सोपे नाही! विश्वचषक जिंकलेल्या १९ वर्षांखालील भारतीय संघाचा वाचा संघर्षगाथा
वाढदिवस विशेष: सर्वाधिक फलंदाजांना शून्यावर बाद करणारा अवलिया, ज्याला संघ सहकारी म्हणायचे ‘कबूतर’