जागतिक कसोटी चॅम्पियनशिप स्पर्धा संपल्यानंतर कसोटी क्रिकेटच्या वेगवेगळ्या बाबींवर चर्चा सुरू झाली आहे. या स्पर्धेचे स्वरूप कसे असावे इथपासून खेळपट्ट्या कशा असाव्यात यावर देखील चर्चा होतेय. भारताचे माजी क्रिकेटपटू व १९८३ क्रिकेट विश्वचषक जिंकणार्या भारतीय संघाचे सदस्य मोहिंदर अमरनाथ यांनीदेखील याबाबत एक महत्त्वपूर्ण विधान करत आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेला (आयसीसी) सल्ला दिला आहे.
खेळपट्ट्यांबाबत दिला सल्ला
भारताच्या सर्वकालीन महान अष्टपैलूंपैकी एक असलेल्या अमरनाथ यांनी नुकतीच एका वृत्तवाहिनीला मुलाखत दिली. या मुलाखतीत त्यांनी आगामी जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या स्पर्धेवेळी तटस्थ क्युरेटर्स यांनी खेळपट्ट्या बनवाव्यात असा सल्ला दिला.
अमरनाथ म्हणाले, “आयसीसीने ज्याप्रकारे तटस्थ पंचांचे पॅनेल बनवले आहे, त्याचप्रकारे तटस्थ क्युरेटर्सचे पॅनेल देखील जागतिक कसोटी चॅम्पियनशिपसाठी तयार केले जावे. या संघाने आयसीसीच्या मार्गदर्शक सूचना पाळल्या पाहिजेत. पाचव्या दिवसापर्यंत हा सामना चालेल याची जबाबदारी त्यांनी घ्यायला हवी. भारत आणि इंग्लंड यांच्या दरम्यान अहमदाबाद येथे झालेली कसोटी दोन दिवसात संपली. यामुळे सामना आणि स्पर्धा नीरस ठरते.”
भारतीय संघ मायदेशात खेळत असताना फिरकीला अनुकूल खेळपट्ट्या बनवतो, असा प्रत्येकवेळी आरोप होत असतो.
अंतिम सामना पूर्ण होणे गरजेचे
जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यांचे स्वरूप कसे असावे याबाबत छेडले असता अमरनाथ म्हणाले, “स्पर्धेचा एकच विजेता असतो. संयुक्त विजेतेपद देणे कधीही पर्याय नाही. तुम्ही एक सामना खेळवा अथवा तीन सामन्यांची अंतिम फेरी खेळवा, तुम्हाला एकच विजेता निवडावा लागेल. या बाबीकडे देखील आयसीसीने गंभीरतेने पहावे.”
मोहिंदर अमरनाथ हे आपल्या परखड स्वभावासाठी ओळखले जातात. या कारणाने भारतीय संघाच्या निवड समितीचे सदस्य असताना बीसीसीआय अधिकाऱ्यांशी खटके उडाले होते.
भारताचे महान खेळाडू आहेत
मोहिंदर अमरनाथ यांचा समावेश भारताच्या सर्वोत्तम क्रिकेटपटूंमध्ये केला जातो. कपिल देव यांच्या नेतृत्वात भारतीय संघाने केलेल्या १९८३ विश्वचषकाच्या उपांत्य व अंतिम सामन्यात ते सामनावीर ठरले होते. त्यांचे वडील लाला अमरनाथ हे भारताचे माजी कर्णधार राहिले आहेत. तसेच, त्यांचे बंधू सुरिंदर अमरनाथ यांनीदेखील भारतीय संघाचे प्रतिनिधित्व केले आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
विराट आणि रोहितच्या नेतृत्त्वपदावरुन भिडले भारत-पाक दिग्गज, पाहा कोणी कोणाला दिला पाठिंबा?
‘टोकियो ऑलिम्पिक म्हटलं की मिल्खा सिंग यांचे नाव येतेच,’ पंतप्रधान मोदींनी काढली फ्लाइंग सिखची आठवण
साताऱ्याच्या पठ्ठ्याचं पंतप्रधान मोदींकडून तोंडभरुन कौतुक! ‘मन की बात’मध्ये सांगितली संघर्षाची गोष्ट