आयपीएलच्या आतापर्यंतच्या अंतिम सामन्याबद्दल बोलायचं झालं तर, एमएस धोनीच्या (MS Dhoni) नेतृत्वातील चेन्नई सुपर किंग्जच्या संघाने आतापर्यंत दहा स्पर्धांमध्ये (चेन्नई संघ स्पॉट फिक्सिंग प्रकरणामुळे २०१६-१७ मध्ये बाहेर होता) भाग घेतला आहे. त्यात ८ वेळा ते अंतिम सामन्यात पोहोचले आहेत आणि ३ वेळा त्यांनी या स्पर्धेचे विजेतेपद आपल्या नावावर केले आहे.
रोहित शर्माच्या (Rohit Sharma) नेतृत्वातील मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) संघाने सर्वाधिक ४ वेळा आयपीएलचे विजेतेपद पटकाविले आहेत. तर कोलकाता नाईट रायडर्सने (Kolkata Knight Riders) गौतम गंभीरच्या (Gautam Gambhir) नेतृत्वात २ वेळा विजेतेपद जिंकले होते. हैद्राबादच्या संघानेही (सनरायजर्स हैद्राबाद, पूर्वीचे नाव डेक्कन चार्जर्स) २ वेळा आयपीएलचे विजेतेपद पटकाविले आहे. तर राजस्थान रॉयल्स (Rajasthan Royals) आयपीएलचे विजेतेपद जिंकणारा पहिला संघ आहे.
आयपीएल २००८- (पहिला मोसम)
राजस्थानला २००८मध्ये कोणीही या विजेतेपदाचा दावेदार मानत नव्हते. परंतु शेन वॉर्नच्या नेतृत्वात त्याच्या युवा खेळाडूंनी अंतिम सामन्यात स्थान मिळविले. तसेच मुंबईच्या डी. वाय. पाटील स्टेडियममध्ये १ जूनला खेळण्यात आलेल्या अंतिम सामन्यात चेन्नईला पराभूत करत राजस्थानने ३ विकेट्सने विजय मिळविला होता. राजस्थानला विजयासाठी शेवटच्या चेंडूवर १ धाव पाहिजे होती. लक्ष्मीपति बालाजीच्या (Lakshmipathy Balaji) गोलंदाजीवर पाकिस्तानच्या सोहेल तन्वीरने (Sohail Tanvir) ही महत्त्वपूर्ण धाव घेतली होती.
आयपीएल २००९- (दुसरा मोसम)
जोहान्सबर्गमध्ये २४ मे २००९मध्ये खेळण्यात आलेल्या अंतिम सामन्यात डेक्कन चार्जर्सच्या संघाने ६ बाद १४३ धावा केल्या होत्या. परंतु स्टार खेळाडूंनी सज्ज असलेला रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाला ९ बाद १३७ धावाच करता आल्या होत्या. आरसीबीला विजयासाठी शेवटच्या षटकात १५ धावांची आवश्यकता होती आणि रॉबिन उथप्पा खेळपट्टीवर होता. परंतु आरपी सिंगने या षटकात केवळ ८ धावाच दिल्या होत्या.
आयपीएल २०१०- (तिसरा मोसम)
चेन्नई सुपर किंग्जने आयपीएलच्या तिसऱ्या मोसमात म्हणजेच आयपीएल २०१०मध्ये पहिले विजेतेपद पटकाविले होते. त्यांनी २५ एप्रिलला डी. वाय. पाटील स्टेडियममध्ये खेळण्यात आलेल्या अंतिम सामन्यात मुंबई इंडियन्सवर २२ धावांनी विजय मिळविला होता. सचिन तेंडुलकरच्या (Sachin Tendulkar) नेतृत्वातील मुंबई संघाला चेन्नईच्या १६९ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना ९ बाद १४६ धावाच करता आल्या होत्या.
आयपीएल २०११- (चौथा मोसम)
चेन्नई संघाला यानंंतर एक वर्षानंतर म्हणजेच २८ मे २०११ला आपल्या घरच्या मैदानावर आरसीबीला २८ धावांनी पराभूत केले होते. तसेच आयपीएलचे सलग दुसरे विजेतेपद आपल्या नावावर केले होते.
आयपीएल २०१२- (पाचवा मोसम)
गंभीरच्या नेतृत्वातील केकेआर संघाने २७ मे २०१२ला चेन्नई संघाला आयपीएलचे विजेतेपद जिंकण्याची हॅट्रिक पूर्ण करू दिली नाही. त्यांनी चेन्नईला त्यांच्याच मैदानावर ५ विकेट्सने पराभूत केले होते. केकेआरसमोर १९१ धावांचे आव्हान होते. मनोज तिवारीेने ड्वेन ब्रावोच्या गोलंदाजीवर सलग २ चौकार मारत संघाला २ चेंडू शिल्लक ठेवून आयपीएलचे पहिले विजेतेपद मिळवून दिले होता.
आयपीएल २०१३- (सहावा मोसम)
रोहितने नेतृत्व सांभाळल्यानंतर मुंबई इंडियन्सने २०१३मध्ये पहिल्यांदा विजेतेपद पटकाविले होते. मुंबईने कोलकाता येथे २६ मे ला खेळण्यात आलेल्या अंतिम सामन्यात चेन्नईला २३ धावांनी पराभूत केले होते. त्या सामन्यात कायरन पोलार्डने नाबाद सर्वाधिक ६० धावा केल्या होत्या.
आयपीएल २०१४- (सातवा मोसम)
१ जून २०१४ ला बंगळुरुमध्ये किंग्ज इलेव्हन पंजाबने आयपीएलच्या अंतिम सामन्यात ४ बाद १९९ धावा केल्या होत्या. त्यावेळी केकेआरने निर्धारित षटकांंमधील ३ चेंडू शिल्लक ठेवत पंजाबवर विजय मिळवला होता. पीयूष चावलाने शेवटच्या षटकात परविंदर अवानाच्या गोलंदाजीवर विजयी चौकार ठोकला होता.
आयपीएल २०१५- (आठवा मोसम)
मुंबई इंडियन्सने २४ मे २०१५ ला कोलकातामध्ये खेळण्यात आलेल्या अंतिम सामन्यात चेन्नईवर ४१ धावांनी सहजपणे विजय मिळवला होता. त्या सामन्यात लेंडल सिमन्स (६८) आणि रोहित शर्माने (५०) अर्धशतकी खेळी केली होती.
आयपीएल २०१६- (नववा मोसम)
आयपीएलच्या नवव्या मोसमाच्या अंतिम सामन्यात २९ मे २०१६ला सनरायजर्स हैद्राबादने आरसीबीला ८ धावांनी पराभूत केले होते. आरसीबी समोर २०९ धावांचे लक्ष्य होते. परंतु त्यांना शेवटच्या षटकात १८ धावांची आवश्यकता होती. ते त्यांना केवळ १०च धावा करता आल्या.
आयपीएल २०१७- (दहावा मोसम)
रायझिंग पुणे सुपरजायंट्स संघ २१ मे २०१७ला हैद्राबादमध्ये अंतिम सामन्यात मुंबईला पराभूत करण्याच्या खूप जवळ पोहोचला होता. परंतु शेवटच्या षटकात १ धावेने पराभव स्विकारावा लागला होता. त्या सामन्यात मुंबईने पुणे सुपरजायंट्सला १३० धावांचे आव्हान दिले होते. त्यावेळी पुणे सुपरजायंट्सने १२८ धावा केल्या होत्या.
आयपीएल २०१८- (अकरावा मोसम)
चेन्नई सुपर किंग्जने २०१८मध्ये २ वर्षांच्या बंदीनंतर पुनरागमन केले होते. तसेच २७ मेला मुंबईत खेळण्यात आलेल्या अंतिम सामन्यात हैद्राबादला ९ चेंडू शिल्लक ठेवत ८ विकेट्सने पराभूत केले होते. त्या सामन्यात शेन वॉट्सनने चेन्नईसाठी नाबाद ११७ धावांची खेळी केली होती.
आयपीएल २०१९- (बारावा मोसम)
मुंबई इंडियन्सने एक वर्षांनंतर १२ मे २०१९ला अंतिम सामन्यात हैद्राबादमध्ये १ धावेने अविस्मरणीय विजय मिळविला होता. मुंबईने चेन्नईसमोर १५० धावांचे आव्हान दिले होते. त्यावेळी चेन्नईला ७ बाद १४८ धावाच करता आल्या होत्या. चेन्नईला विजयासाठी शेवटच्या षटकात ९ धावांची आवश्यकता होती. तर वॉट्सन आणि रविंद्र जडेजा खेळपट्टीवर होते. परंतु या दोघांवरही लसिथ मलिंगा भारी पडला होता.
आयपीएल (IPL) कोरोना व्हायरसमुळे अनिश्चित काळासाठी स्थगित करण्यात आले आहे. मागील वेळापत्रकाप्रमाणे २९ मार्चला आयपीएलचे आयोजन होणार होते. तसेच यातील अंतिम सामना २४ मेला खेळण्यात येणार होता.