बुधवारी(21 एप्रिल) इंडियन प्रीमीयर लीग 2021 हंगामात कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स संघात सामना झाला. हा सामना चेन्नईने 18 धावांनी जिंकला. चेन्नईच्या विजयात युवा ऋतुराज गायकवाडने अर्धशतकी खेळी करत मोलाचे योगदान दिले. सामन्यानंतर त्याच्याबद्दल चेन्नई संघाचा कर्णधार एमएस धोनीने प्रतिक्रिया दिली आहे.
खरंतर या हंगामात कोलकाताविरुद्धच्या सामन्याआधी खेळलेल्या तीन्ही सामन्यात ऋतुराज मोठ्या धावा करण्यात अपयशी ठरला होता. पहिल्या तीन सामन्यात मिळून त्याला केवळ 20 धावा करता आल्या होत्या. मात्र, तरीही चेन्नई संघाने त्याच्यावर विश्वास ठेवत त्याला कोलकाताविरुद्धच्या सामन्यासाठीही संघात कायम केले होते. त्यानेही हा विश्वास सार्थ ठरवत 42 चेंडूत 64 धावा फटकावल्या आणि फाफ डू प्लेसिसबरोबर पहिल्या गड्यासाठी शतकी भागीदारी केली.
सामना झाल्यानंतर बोलताना धोनी म्हणाला की, “ऋतुराज गायकवाडने गेल्या मोसमात आपली कामगिरी दाखवली आहे. परंतु, तो मानसिकदृष्ट्या कसा आहे हे पाहण्याकरीता मी त्याला तुला कसे वाटत आहे, असे विचारले. जेव्हा कधी आपण कोणाला असा प्रश्न विचारतो तेव्हा आपण त्याच्या उत्तराची वाट पाहत असतो आणि त्याच्या डोळ्यात नक्की काय आहे हे पाहतो. परंतु मला त्याच्या डोळ्यात तो गोंधळून गेला नसल्याचे दिसले. हीच गोष्ट मी माझ्या आयुष्यात करत आलो आहे.”
तसेच या सामन्यात ऋतुराजशिवाय फाफ डु प्लेसिसनेही जबरदस्त खेळी खेळली. त्याने 60 चेंडूत 9 चौकार आणि 4 षटकारांच्या मदतीने 95 धावांची नाबाद खेळी केली. या चमकदार खेळीत त्याला ऋतुराजने सुरेख साथ दिली. त्यामुळे डु प्लेसिसने ऋतुराजचे कौतुक केले.
तो म्हणाला की, “ऋतुराज हा एक उत्तम भारतीय प्रतिभाशाली खेळाडू असून त्याची फलंदाजी पाहायला चांगले वाटते. त़्याची खेळी ही वेळ आणि तंत्रावर अवलंबून होती.”
महत्त्वाच्या बातम्या –
मुंबई इंडियन्स संघाची ‘ही’ आहे सर्वात मोठी ताकद, ट्रेंट बोल्टने केला खुलासा
वा रे भावा! शतक ठोकताच २० वर्षीय पडीक्कलने मिळवले ‘या’ खास विक्रमाच्या यादीत तिसरे स्थान