शारजाह। कोलकाता नाईट रायडर्सने गुरुवारी(७ ऑक्टोबर) राजस्थान रॉयल्सला इंडियन प्रीमीयर लीग २०२१ हंगामाच्या ५४ व्या सामन्यात तब्बल ८६ धावांनी धूळ चारली. या विजयासह कोलकाताने गुणतालिकेतील चौथे स्थान जवळपास पक्के केले आहे. कोलकाताचा हा या आयपीएल हंगामातील ७ वा विजय होता. त्यामुळे त्यांचे १४ गुण झाले आहेत.
असे आहे प्लेऑफचे समीकरण
आयपीएल १४ च्या हंगामात चेन्नई सुपर किंग्स, दिल्ली कॅपिटल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर यांनी उत्तम कामगिरी करत प्लेऑफमधील स्थान यापूर्वीच पक्के केले होते. त्यामुळे प्लेऑफमधील चौथ्या स्थानासाठी कोलकाता, मुंबई इंडियन्स, राजस्थान रॉयल्स आणि पंजाब किंग्स या संघात जोरदार स्पर्धा सुरु होती. तर, सनरायझर्स हैदराबाद या स्पर्धेतून खराब कामगिरीमुळे सर्वात आधी बाहेर पडले होते.
प्लेऑफच्या प्रवेशासाठी गुरुवारी झालेला कोलकाता विरुद्ध राजस्थान सामना फार महत्त्वाचा होता. या सामन्यात कोलकाताने विजय मिळवत पंजाब आणि राजस्थानसाठी प्लेऑफचे दरवाजे बंद केले. तर, मुंबईसाठीही मार्ग खडतर केला. पंजाबचे गुणतालिकेत १२ गुण आहेत, तर राजस्थानही पराभूत झाल्यामुळे १० गुणांवर कायम राहिले. त्यामुळे त्यांचे आव्हान संपुष्टात आले.
आता केवळ मुंबई इंडियन्सला १४ गुण मिळवण्याची संधी आहे. पण त्यांच्यासमोर सर्वात मोठा अडथळा आहे तो नेट रनरेटचा. कारण, कोलकाताने राजस्थानविरुद्ध मिळवलेल्या विजयामुळे त्यांचा रनरेट सर्व संघापेक्षा अधिक आहे. त्यांचा +०.५८७ रनरेट आहे. तर, मुंबईचे सध्या १२ गुण असून – ०.०४८ रनरेट आहे. मुंबईचा एक सामना बाकी आहे. हा सामना शुक्रवारी (८ ऑक्टोबर) सनरायझर्स हैदराबादविरुद्ध होणार आहे.
हा सामना जर मुंबई पराभूत झाले, तर कोलकाता त्यांच्या गुणांच्या आधारेच प्लऑफसाठी थेट पात्र होतील. पण जर मुंबईने हा सामना जिंकला, तर मात्र नेटरनरेट महत्त्वाचा ठरणार आहे. याबाबतीत जर मुंबईला प्लेऑफमध्ये प्रवेश करायचा झाल्यास त्यांना कोलकातापेक्षाही अधिक रनरेट मिळवावा लागेल.
त्यासाठी त्यांना प्रथम फलंदाजी करताना २०० धावा करुन हैदराबादला १७० पेक्षाही अधिक धावांनी पराभूत करावे लागेल. तसेच जर त्यांना या सामन्यात धावांचा पाठलाग करावा लागला, तर मात्र त्यांचा नेटरनरेट कोलकातापेक्षा अधिक होणार नाही. त्यामुळे हैदराबादने प्रथम फलंदाजीसाठी उतरताच मुंबईचे आयपीएल २०२१ मधील आव्हान संपुष्टात येईल.
हैदराबाद विरुद्ध मुंबई सामना शुक्रवारी भारतीय प्रमाणवेळेनुसार संध्याकाळी ७.३० वाजता अबुधाबी येथे पार पडेल.
महत्त्वाच्या बातम्या –
शफाली-जेमिमाच्या फटकेबाजीने जिंकले मन; मात्र, पावसाने सामना झाला रद्द
‘ती परदेशी नाही, तर दिल्लीची मुलगी’, दीपक चाहरने प्रपोज केलेल्या मुलीबद्दल बहिणीने दिली माहिती