रणजी चॅम्पियन मुंबईनं 15व्यांदा इराणी ट्रॉफी जिंकली आहे. पहिल्या डावातील आघाडीच्या जोरावर मुंबईनं इराणी चषकावर कब्जा केला.
मुंबईनं पहिल्या डावात 537 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात, रेस्ट ऑफ इंडियाचा डाव 416 धावांवर आटोपला. मुंबईनं दुसऱ्या डावात शानदार फलंदाजी करत 8 बाद 328 धावा केल्या. पहिल्या डावातील 222 धावांच्या खेळीसाठी मुंबईच्या सरफराज खानला सामनावीर पुरस्कार मिळाला. मुंबईनं या सामन्यात रेस्ट ऑफ इंडिया संघावर पूर्णपणे वर्चस्व राखलं. त्यांनी तब्बल 27 वर्षांनंतर इराणी चषकावर कब्जा केला आहे.
मुंबईसाठी धनुष कोटियननं दुसऱ्या डावात नाबाद 114 धावा केल्या. त्यानं पहिल्या डावातही 64 धावा केल्या होत्या आणि तीन विकेट्स घेतल्या. सरांश जैननं दुसऱ्या डावात सहा विकेट घेतल्या. पण तो मुंबईच्या संघावर फार दडपण आणू शकला नाही. मुंबईनं 1997 नंतर प्रथमच इराणी कपचं विजेतेपद पटकावलं आहे.
सामन्यात प्रथम फलंदाजी करताना मुंबईनं पहिल्या दिवशी चार गड्यांच्या मोबदल्यात 237 धावा केल्या होत्या. दुसऱ्या दिवशी कर्णधार अजिंक्य रहाणेनं 86 आणि सरफराज खाननं 54 धावा केल्या. रेस्ट ऑफ इंडियासाठी मुकेश कुमारनं 5 बळी घेतले.
दुसऱ्या डावात फलंदाजीला आलेल्या रेस्ट ऑफ इंडियानं 416 धावा केल्या. यात संघाचा कर्णधार अभिमन्यू ईश्वरनच्या शतकाचाही समावेश आहे. ईश्वरननं 191 धावांची शानदार खेळी केली. याशिवाय ध्रुव जुरेलनं 93 धावा केल्या. मुंबईकडून शम्स मुलानी आणि तनुष कोटियन यांनी 3-3 बळी घेतले. अशाप्रकारे मुंबईला पहिल्या डावात 121 धावांची आघाडी मिळाली.
मुंबईचा संघ दुसऱ्या डावात फलंदाजीला आला तेव्हा त्यांनी 78 षटकात 329 धावा केल्या. यात तनुष कोटियनच्या शतकी खेळीचाही समावेश आहे. त्यानं 150 चेंडूत 114 धावांची खेळी केली. पाचव्या दिवसाचा खेळ संपल्यामुळे रेस्ट ऑफ इंडिया संघाला दुसऱ्या डावात फलंदाजी करता आली नाही आणि सामना अनिर्णित राहिला. मात्र मुंबईनं पहिल्या डावात आघाडी घेतल्यानं त्यांना विजयी घोषित करण्यात आलं.
हेही वाचा –
ind vs ban; पहिल्याच सामन्यात मयंक यादवसह हे 3 खेळाडू भारतासाठी पदार्पण करण्याची शक्यता
भारत-बांगलादेश टी20 मालिका कोणत्या चॅनलवर लाईव्ह दिसणार? सर्वकाही जाणून घ्या
टी20 विश्वचषक भारतीय संघाचे संपूर्ण वेळापत्रक, जाणून घ्या कधी आणि कोणासोबत मुकाबला?