चेन्नईच्या चेपॉक स्टेडियमवर चालू असलेल्या पहिल्या कसोटी सामन्याच्या तिसऱ्या दिवशी पाहुण्या इंग्लंडचा पहिला डाव ५७८ धावांवर आटोपल्यावर भारतीय संघाची खराब सुरुवात झाली होती. चहापानापर्यंत इंग्लंडने शंभर धावसंख्येच्या आत भारताच्या चार फलंदाजांना पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला होता. त्यानंतर खालच्या फळीत फलंदाजीला आलेला यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंत याने आक्रमक खेळी केली होती. परंतु अवघ्या ९ धावांनी त्याचे शतक हुकले होते.
असे असले तरीही, इंग्लंडचे माजी क्रिकेटपटू नासिर हुसैन यांनी पंतची भरभरून प्रशंसा केली आहे. त्यांच्या मते, फलंदाजी करतेवेळी पंतचा रवैय्या अगदी बेन स्टोक्सप्रमाणे असतो. आपल्या फलंदाजीत योग्य बदल करण्याची त्याच्यात क्षमता आहे. त्याच्या या शैलीमुळेच भारताने ब्रिस्बेन कसोटी जिंकली असल्याचे त्यांनी सांगितले आहे.
डेली मेलच्या आपल्या कॉलममध्ये त्यांनी लिहिले की, ‘रिषभ पंत याच्यात आपल्या फलंदाजीत अविश्वसनीय अशी फेरबदल करण्याची क्षमता आहे. जर त्याने आपल्या निर्भय शैलीत फलंदाजी केली नसती, जर त्याच्यात आत्मविश्वासाची कमतरता असती; तर भारतीय संघ मागील महिन्यात ब्रिस्बेनमधील तो सामना जिंकू शकला नसता. ज्यामुळे भारताने आतापर्यंतचा सर्वात मोठा मालिका विजय मिळवला आहे.’
‘पंत कधीही आपल्या बाद होण्याचा विचार करत नाही. तो फक्त आक्रमक फलंदाजी करण्याच्या विचारात असतो. त्याला माहिती आहे की तो काय करू शकतो. जर तो स्वस्तात बाद झाल्यानंतर आपल्या फलंदाजीची किंवा पुनरागमनाची चिंता करत बसला असता; तर तो अशाप्रकारे फलंदाजी करुच शकला नसता,’ असे पुढे हुसैन यांनी लिहिले.
पहिल्या डावात केली होती आक्रमक फलंदाजी
चेन्नई कसोटीतील पहिल्या डावात सहाव्या क्रमांकावर फलंदाजीला येत पंतने १०३.४१ च्या स्ट्राईक रेटने फटकेबाजी करत ९१ धावा चोपल्या होत्या. या खेळीसाठी त्याने ८८ चेंडू खेळले आणि ५ षटकार व ९ चौकार मारले. अखेर ५६.४ षटकात इंग्लंडचा गोलंदाज डोम बेसने जॅक लीचच्या हातून त्याला झेलबाद केले होते. आता सामन्याच्या अखेरच्या दिवशी दुसऱ्या डावात भारतापुढे ३८१ धावांचे लक्ष्य आहे. अशात पंतकडून संघाला मोठ्या आकडी धावसंख्येची अपेक्षा असणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
आव्हान मोठे असले तरी भारताला विजय शक्य; १२ वर्षांपूर्वीही केला होता असाच कारनामा
हिटमॅन आऊट ‘हा’ सलामीवीर इन! रोहित शर्माच्या फ्लॉप शोमुळे क्रिकेट रसिकांनी केली मागणी
रोहित शर्मा ते विराट कोहली: कसोटी क्रिकेटमध्ये पार्ट-टाइम गोलंदाजी करणारे ५ भारतीय क्रिकेटपटू






