ऑस्ट्रेलियाचा दिग्गज ऑफ स्पिनर नॅथन लायनने आपल्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील शेवटच्या मोठ्या इच्छेबाबत मोठं विधान केलं आहे. 37 वर्षीय लायन सध्या निवृत्तीपासून दूर असून, त्याला भारतामध्ये टेस्ट मालिका जिंकूनच आपल्या शानदार करिअरची सांगता करायची आहे.
लायनने आतापर्यंत 138 टेस्ट सामन्यांमध्ये 556 बळी घेतले असून तो ऑस्ट्रेलियाच्या इतिहासातील सर्वाधिक यशस्वी ऑफ स्पिनर ठरला आहे. भारताविरुद्ध त्याने 32 टेस्ट सामन्यांत 130 विकेट्स घेतल्या आहेत. मात्र, तो कधीच भारतात टेस्ट मालिका जिंकणाऱ्या संघाचा भाग राहिलेला नाही.
ऑस्ट्रेलियाने शेवटचं वेळेस 2004 मध्ये भारतात बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी जिंकली होती. त्यानंतर भारतात काही सामन्यांमध्ये विजय मिळवले असले तरी, मालिका जिंकण्यात अपयश आले आहे. लायनने त्यावेळी अजून प्रोफेशनल क्रिकेटची सुरुवातदेखील केलेली नव्हती.
क्रिकेट डॉट कॉम डॉट एयूला दिलेल्या मुलाखतीत लायन म्हणाला: “मी नेहमी म्हटले आहे की, मला भारतात एक टेस्ट मालिका जिंकायची आहे. तसेच इंग्लंडमध्येही. आम्हाला पुढील काही वर्षांत संधी मिळेल. पण सध्या एकेक टेस्टवर लक्ष केंद्रित करणे गरजेचे आहे. वेस्ट इंडिजविरुद्धची मालिका चांगली पार पडावी यासाठी प्रयत्न सुरू आहेत. त्यानंतर घरी एशेजची मालिका आणि एक सुंदर समर सीझन असेल. पण अजून एक वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनल खेळण्याची माझी इच्छा नक्कीच आहे.”
यावरून स्पष्ट होतं की नॅथन लायन केवळ वैयक्तिक कामगिरीवर समाधान मानणारा खेळाडू नाही, तर संघाच्या ऐतिहासिक यशासाठी झटणारा खेळाडू आहे. भारतात मालिका जिंकणं ही ऑस्ट्रेलियन संघासाठी आजही एक “अपूर्ण मिशन“ असल्याचं त्याच्या विधानातून दिसून येतं. लायनच्या अनुभवासोबत त्याची भारतातील खेळपट्ट्यांवरील समज, आणि दमदार फिरकी कौशल्य हे आगामी दौऱ्यात ऑस्ट्रेलियासाठी निर्णायक ठरू शकतात.






