इंग्लंड दौऱ्यावर भारतीय फलंदाजांची कामगिरी खूपच चांगली आहे. यशस्वी जैस्वाल, शुभमन गिल, ऋषभ पंत आणि के.एल. राहुल या सर्वांनी चांगली खेळी केली आहे. पण सध्या सर्वांचं लक्ष करुण नायरकडे आहे, कारण तो चारही डावात अपयशी ठरला आहे. विशेषतः लॉर्ड्समध्ये त्याची जागा टिकेल की नाही, यावरच आता चर्चा सुरू आहे.
पण माजी क्रिकेटपटू आणि सध्या समालोचक असलेले आकाश चोप्रा करुण नायरच्या बाजूने उभे राहिले आहेत. ते म्हणाले की करुण नायरने टीम इंडियात परत येण्यासाठी खूप मेहनत घेतली आहे. देशांतर्गत क्रिकेटमध्ये त्याने खूप चांगली कामगिरी केली आणि त्यामुळेच त्याला 8 वर्षांनी पुन्हा संघात संधी मिळाली.
करुण नायरला इंग्लंड दौर्यावर पहिल्या कसोटीत संधी मिळाली, पण त्याने 4 डावांमध्ये फक्त 77 धावा केल्या आहेत. एका डावात तो शून्यावरही (डक आउट) बाद झाला. त्याला तिसऱ्या क्रमांकावरही खेळवण्यात आले, पण त्याचा फारसा फायदा झाला नाही. नायरला खेळवण्यासाठी साई सुदर्शनला एका सामन्यात वगळावं लागलं, हे सुद्धा लक्षात घेण्यासारखं आहे.
यूट्यूब चॅनलवर आकाश चोप्राने सांगितलं “करुण नायरने देशांतर्गत क्रिकेटमध्ये खूप चांगली खेळी केली म्हणून त्याला ही संधी मिळाली आहे. तो फलंदाजी करताना खूप सुंदर दिसतो, पण मोठी खेळी करत नाही. त्याला अजून एक संधी नक्कीच द्यायला हवी.” तो पुढे म्हणाला की “पहिल्यांदा जेव्हा त्याला खेळायला मिळालं होतं, तेव्हा त्याने त्रिशतक (300 धावा) केल्या होत्या. पण तरीही त्याला संघातून बाहेर काढण्यात आलं होतं. आता त्याला पुन्हा एकदा संधी मिळाली आहे, तर ती पूर्णपणे द्यायला हवी.”
करुण नायरची कामगिरी सध्या खास नाही, पण त्याच्या मेहनतीची दखल घेत आकाश चोप्रा त्याच्यावर विश्वास ठेवत आहे. आता पाहायचं की टीम मॅनेजमेंट त्याला आणखी एक संधी देते का… की नव्या चेहऱ्यांना संधी दिली जाईल.






