आयसीसी टी२० विश्वचषक स्पर्धा झाल्यानंतर आता भारत आणि न्यूझीलंड या दोन्ही बलाढ्य संघांमध्ये टी२० मलिकेला प्रारंभ झाला आहे. या मालिकेतील पहिला टी२० सामना बुधवारी(१७ नोव्हेंबर) पार पडला होता. या सामन्यात भारतीय संघाने अप्रतिम कामगिरी करत ५ गडी राखून जोरदार विजय मिळवला होता. यासह टी२० मालिकेत १-० ची आघाडी घेतली आहे. आता दुसरा टी२० सामना शुक्रवारी (१९ नोव्हेंबर) पार पडणार आहे. या सामन्यात न्यूझीलंड संघात मोठा बदल पाहायला मिळू शकतो.
या मालिकेसाठी न्यूझीलंड संघाचा नियमित कर्णधार केन विलियम्सनला विश्रांती देण्यात आली आहे. यानंतर न्यूझीलंड संघाने टी२० मालिकेसाठी कर्णधार रोटेशन धोरण स्वीकारण्याचे ठरवले आहे. या नियमानुसार न्यूझीलंड तीन्ही टी२० सामन्यांमध्ये वेगवेगळ्या कर्णधारांसह उतरेल.
भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील दुसरा टी२० सामना रांचीच्या मैदानावर पार पडणार आहे. अशातच न्यूझीलंड संघाकडून एक मोठी बातमी समोर येत आहे. कर्णधार रोटेशन धोरण अंतर्गत दुसऱ्या टी२० सामन्यासाठी ट्रेंट बोल्ट किंवा मिचेल सँटनरला कर्णधारपद दिले जाऊ शकते. या दोघांपैकी एक खेळाडू न्यूझीलंड संघाचे कर्णधारपद सांभाळताना दिसून येऊ शकतो.
न्यूझीलंडचे संघाचे मुख्य प्रशिक्षक गॅरी स्टीड म्हणाले की, “मी २४ तास अगोदरच ठरवतो की कोणाला विश्रांती द्यायची आहे, आम्ही कसोटी मालिका पाहता हे करत आहोत. टी२० विश्वचषकानंतर लगेचच मालिका खेळण्याची ही पहिलीच वेळ आहे.”
पहिल्या टी२० सामन्यात भारतीय संघाचा जोरदार विजय
पहिल्या टी२० सामन्याबाबत बोलायचं झालं तर, भारतीय संघाने या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. तर न्यूझीलंड संघाकडून प्रथम फलंदाजी करताना मार्टिन गप्टीलने सर्वाधिक ७०, तर मार्क चॅपमनने ६३ धावांचे योगदान दिले. या खेळीच्या जोरावर न्यूझीलंड संघाला २० षटक अखेर ६ बाद १६४ धावा करण्यात यश आले होते.
या धावांचा पाठलाग करताना भारतीय संघाकडून सूर्यकुमार यादवने सर्वाधिक ६२ धावांची खेळी केली, तर रोहित शर्माने ४८ धावांचे योगदान देत भारतीय संघाला हा सामना ५ गडी राखून जिंकून दिला.
महत्त्वाच्या बातम्या –
एकेकाळी गाजलेल्या ३ क्रिकेट स्पर्धा, ज्यांचा आज सर्वांना पडलाय विसर
ले पंगा! टी२० विश्वचषकातील अशा ५ घटना, ज्यामुळे निर्माण झाले वाद
लक्ष्मणच्या दिमतीला येणार फ्लिंटॉफ-स्टार्क-हेजलवूडला घडवणारा दिग्गज; औपचारिक घोषणा बाकी