इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यात झालेल्या २ सामन्यांच्या कसोटी मालिकेत न्यूझीलंड संघाने उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत १-० ने विजय मिळवला आहे. लॉर्ड्सच्या मैदानावर खेळवण्यात आलेला पहिला कसोटी सामना अनिर्णीत राहिला होता. त्यानंतर एजबस्टनमध्ये झालेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात न्यूझीलंड संघाने जोरदार पुनरागमन केले. या विजयासह न्यूझीलंड संघाने तब्बल २२ वर्षांची प्रतीक्षा संपवली आहे.
न्यूझीलंड संघाने १९९९ मध्ये स्टीफन फ्लेमिंगच्या नेतृत्वाखाली इंग्लंडमध्ये शेवटची कसोटी मालिका जिंकली होती. यावेळी ४ सामन्यांच्या कसोटी मालिकेत त्यांनी २-१ ने विजयी पताका झळकावली होती. त्यानंतर पुढील मालिका जिंकण्यासाठी त्यांना तब्बल २२ वर्षांचा कालावधी लागला आहे.
सामन्याविषयी बोलायचे झाल्यास, इंग्लंड संघाने प्रथम फलंदाजी करताना ३०३ धावांचा डोंगर उभारला होता. तर न्यूझीलंड संघाने पहिल्या डावात ३८८ धावा केल्या होत्या. यासोबतच त्यांनी ८५ धावांनी पुढाकार घेतला होता. त्यानंतर दुसऱ्या डावात फलंदाजी करण्यासाठी आलेल्या इंग्लंड संघाला अवघ्या १२२ धावा करता आल्या होत्या. त्यामुळे न्युझीलंड संघाला विजय मिळवण्यासाठी अवघ्या ३८ धावांची आवश्यकता होती. हे लक्ष्य न्यूझीलंड संघाने १०.५ षटकात पूर्ण केले होते. तसेच मॅट हेनरीला उत्कृष्ट गोलंदाजी केल्यामुळे सामनावीराचा पुरस्कार मिळाला तर कॉनवे आणि रोरी बर्न्स हे दोघे संयुक्त मालिकावीर ठरले.
शेवटच्या डावात धावांचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या न्यूझीलंड संघाला चांगली सुरुवात मिळाली नव्हती. कॉनवेला ब्रॉडने बाद करत माघारी धाडले होते. कॉनवेने या डावात ४ चेंडूत ३ धावा केल्या होत्या. यानंतर स्टोनने विल यंगला माघारी धाडले होते. यंगने ३१ चेंडूत ८ धावांची खेळी केली होती. यापूर्वी, चौथ्या दिवसाची सुरुवात इंग्लंड संघाने ९ बाद १२२ धावांनी केली होती. यामध्ये स्टोनने १५ धावा केल्या होत्या. तर अँडरसन ० धावा करत माघारी परतला होता.
न्यूझीलंड संघाकडून दुसऱ्या डावात गोलंदाजी करताना, हेनरी आणि वेगनरने प्रत्येकी ३-३ तर ट्रेंट बोल्टने आणि एजाज पटेलने प्रत्येकी २-२ गडी बाद केले होते. केन विलियमसन दुखापतग्रस्त असल्यामुळे न्यूझीलंड संघाचे नेतृत्व टॉम लॅथमने केले होते.
महत्त्वाच्या बातम्या-
ब्रॉडने निवडली त्याची ‘ऑलटाईम फेवरेट इलेव्हन’, सचिनसह त्याच्या जिगरी मित्रालाही दिली जागा
‘इंग्लंडला गुंडाळलं, आता भारताचा नंबर,’ न्यूझीलंडच्या दणदणीत विजयानंतर दिग्गजाचा दावा
ना २ किमी धावण्याची मेहनत, ना डच्चूची चिंता; श्रीलंकेला जाणाऱ्या खेळाडूंसाठी ‘खुशखबर’!