येत्या जुलै महिन्यात भारतीय संघ श्रीलंकेचा दौरा करणार आहे. या दौऱ्यावर भारतीय संघाला ३ टी-२० आणि ३ वनडे सामन्यांची मालिका खेळायची आहे. विराट कोहलीच्या अनुपस्थितीत या मालिकेत शिखर धवन भारतीय संघाचे नेतृत्व करणार आहे. तसेच या मालिकेत युवा खेळाडूंना स्थान देण्यात आले आहे. निवड झालेल्या खेळाडूंना श्रीलंकेसाठी उड्डाण भरण्यापुर्वी १४ दिवस मुंबईमध्ये विलगिकरणात राहावे लागणार आहे. अशातच बीसीसीआयने या दौऱ्यावर जाणाऱ्या खेळाडूंना मोठा दिलासा दिला आहे.
क्रिकबजच्या वृत्तानुसार, श्रीलंका दौऱ्यावर जाणाऱ्या खेळाडूंची फिटनेस चाचणी करण्यात येणार नाही. कोरोना असल्यामुळे बीसीसीआयने हा निर्णय घेतला आहे. भारतातील अनेक राज्यांमध्ये लॉकडाउन आहे. त्यामुळे या मालिकेत सहभागी होणारे खेळाडू यो-यो टेस्ट आणि २ किमी न धावता श्रीलंकेला जाऊ शकतात. याचा मोठा फायदा वरुन चक्रवर्तीला होणार आहे. कारण वरुन चक्रवर्ती यापुर्वी २ वेळेस फिटनेस चाचणी पूर्ण करण्यात अपयशी ठरला आहे.
तसेच रवी शास्त्री यांच्या अनुपस्थित राहुल द्रविड यांना संघाचे मुख्य प्रशिक्षकपद देण्यात आले आहे. त्यांच्यासोबत आणखी दोन साहाय्यक प्रशिक्षकही जाणार आहेत. यामध्ये क्षेत्ररक्षण प्रशिक्षक म्हणून टी दिलीप आणि गोलंदाजी प्रशिक्षक म्हणून पारस महांब्रे जाणार आहेत. २७ जून रोजी भारतीय संघ श्रीलंकेला रवाना होणार आहे. तिथे त्यांना ३ दिवस विलगिकरणात राहावे लागणार आहे. त्यानंतर १३ जुलैपासून वनडे सामन्याने या मालिकेला सुरुवात होणार आहे. या मालिकेत युवा खेळाडूंना चांगली कामगिरी करून आपली छाप सोडण्याची एक उत्तम संधी असणार आहे.
असा आहे श्रीलंका दौऱ्यासाठी भारतीय संघ
शिखर धवन (कर्णधार), भुवनेश्वर कुमार (उपकर्णधार), पृथ्वी शॉ, देवदत्त पडिक्कल, ऋतुराज गायकवाड़, सूर्यकुमार यादव, मनीष पांडे, हार्दिक पंड्या, नीतीश राणा, ईशान किशन, संजू सॅमसन, युजवेंद्र चहल, राहुल चाहर, कृष्णप्पा गौतम, क्रुणाल पंड्या, कुलदीप यादव, वरुण चक्रवर्ती, दीपक चाहर, नवदीप सैनी आणि चेतन सकारिया.
महत्त्वाच्या बातम्या-
‘त्याच्यावर धोनीने विश्वास दाखवला नाही, मग श्रीलंका दौऱ्यावर कसे काय निवडले?’ दिग्गजाचा मोठा प्रश्न
कसोटी मालिकेपुर्वी दिग्गजाची इंग्लंडला चेतावणी; म्हणाले, ‘रोहित सहज २-३ शतके ठोकणार’