येत्या १८ जून ते २२ जून दरम्यान भारत आणि न्यूझीलंड यांच्यात विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्याचा थरार रंगणार आहे. या सामन्यासाठी भारतीय संघ कसून सराव करत आहे. तर दुसरीकडे न्यूझीलंड संघाने देखील कसोटी मालिकेत इंग्लंड संघाला धूळ चारली आहे. त्यामुळे क्रिकेट चाहत्यांना चुरशीची लढत पाहायला मिळेल यात काही शंका नाही. या मोठ्या सामन्यात भारतीय संघासाठी डावाची सुरुवात रोहित शर्मा करणार आहे. अशातच माजी भारतीय क्रिकेटपटू आकाश चोप्राने रोहित शर्माबद्दल भाष्य केले आहे.
भारतीय संघासाठी १० कसोटी खेळलेल्या आकाश चोपडाने आपल्या यूट्यूब चॅनेलवर म्हटले की,”रोहित शर्मा इंग्लंडमध्ये यशस्वी होणार. रोहितकडे ते कौशल्य आहे, ज्यामुळे भारतीय संघ त्याच्यावर विश्वास दाखवणार. रोहितने विश्वचषक २०१९ स्पर्धेत ५ शतक लगावले होते. तर कसोटी क्रिकेटच्या १२ डावात २ ते ३ शतक येतीलच. तसेच इंग्लिश परिस्थितीचा अनुभव असल्यामुळे रोहित जुनी कामगिरी पुन्हा एकदा करू शकतो.”
विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यात रोहित शर्मा सलामी फलंदाज असणार हे निश्चित आहे. परंतु रोहितसोबत डावाची सुरुवात कोण करणार? यावर अजूनही प्रश्नचिन्ह आहे. यासाठी शुबमन गिल, केएल राहुल आणि मयंक अगरवाल हे तीन दावेदार आहेत. परंतु शुबमन गिलचे नाव सर्वात पुढे आहे. कारण इंट्रास्क्वाड सराव सामन्यात युवा शुबमन गिलने ८५ धावांची तुफानी खेळी केली आहे.
तर न्यूझीलंड संघातील खेळाडू देखील चांगल्याच फॉर्ममध्ये आहेत. इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यात झालेल्या २ सामन्यांच्या कसोटी मालिकेत न्यूझीलंड संघाने १-० ने विजय मिळवला आहे. इंग्लंड संघाला त्यांच्याच देशात जाऊन पराभूत करून न्यूझीलंड संघाने मजबूत बाजू दर्शविली आहे. त्यामुळे विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यात चुरशीची लढत पाहायला मिळणार आहे. हा सामना झाल्यानंतर भारतीय संघाला इंग्लंड संघाविरुद्ध ५ कसोटी सामन्यांची मालिका खेळायची आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
ब्रॉडची ‘या’ नियमावर नाराजी व्यक्त; म्हणाला, ‘आयसीसीने तातडीने काढून टाकला पाहिजे तो नियम’