विशाखापट्टणम। भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका संघात पार पडलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात आज(6 ऑक्टोबर) भारताने 203 धावांनी मिळवला. या विजयाबरोबर भारताने 3 सामन्यांच्या कसोटी मालिकेत 1-0 ने आघाडी घेतली आहे.
या सामन्यात भारताने दक्षिण आफ्रिकेला विजयासाठी 395 धावांचे आव्हान दिले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेला दुसऱ्या डावात सर्वबाद 191 धावाच करता आल्या. भारताकडून या डावात मोहम्मद शमीने सर्वाधिक 5 विकेट्स घेतल्या. तर रविंद्र जडेजाने 4 आणि आर अश्विनने 1 विकेट्स घेतली.
विशेष म्हणजे भारताने घेतलेल्या या डावातील दक्षिण आफ्रिकेच्या सर्व 10 विकेट्समध्ये यष्टीरक्षकाव्यतिरिक्त एकाही क्षेत्ररक्षकाचा समावेश नव्हता.
दक्षिण आफ्रिकेच्या या सर्व 10 विकेट्सपैकी 5 फलंदाज त्रिफळाचीत होऊन बाद झाले. तर 3 फलंदाज पायचीत झाले. तसेच एका फलंदाजाचा झेल गोलंदाजानेच स्वत:च्याच गोलंदाजीवर घेतला आणि एका फलंदाजाचा झेल यष्टीरक्षकाने घेतला.
म्हणजेच हे दक्षिण आफ्रिकेच्या दुसऱ्या डावात सर्व दहा विकेट्स घेताना भारताच्या यष्टीरक्षकाव्यतिरिक्त मैदानावरील एकही क्षेत्ररक्षकाचे योगदान नव्हते.
या सामन्यात भारताने पहिला डाव 7 बाद 502 धावांवर घोषित केला होता. तसेच दक्षिण आफ्रिकेचा पहिला डाव 431 धावांवर संपुष्टात आला होता. त्यामुळे भारताला 71 धावांची आघाडी मिळाली होती. या आघाडीसह भारताने दुसरा डाव 4 बाद 323 धावांवर घोषित करत दक्षिण आफ्रिकेला 395 धावांचे आव्हान दिले होते.