बंगळूरु। गुरुवारी आयपीएल 2019 च्या मोसमातील सातवा सामना रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर विरुद्ध मुंबई इंडियन्स संघात पार पडला. शेवटच्या चेंडूपर्यंत रंगलेल्या या सामन्यात मुंबईने 6 धावांनी विजय मिळवला. मात्र या सामन्यातील शेवटच्या चेंडूमुळे मोठा वाद झाला आहे.
झाले असे की बेंगलोरला विजयासाठी शेवटच्या चेंडूवर 7 धावांची आवश्यकता होती आणि शिवम दुबे फलंदाजी करत होता. तसेच मुंबईचा अनुभवी गोलंदाज लसिथ मलिंगा गोलंदाजी करत होता. त्याने हा शेवटचा चेंडू फुल लेंथवर टाकला, त्यावर शिवमने लाँग ऑफला फटका मारला. त्यामुळे मुंबई इंडियन्सने 6 धावांनी विजय मिळवला.
पण काही वेळानंतर मलिंगाने टाकलेला तो चेंडू नो बॉल असल्याचे दिसून आले. मात्र मैदानावरील पंचांच्या हे लक्षात न आल्याने त्यांनी नो बॉलचा इशारा दिला नाही. यामुळे बेंगलोरला नो बॉलचा फायदाही मिळाला नाही.
याच गोष्टीमुळे बेंगलोरचा कर्णधार विराट कोहली पंचांच्या निर्णयावर भडकला. त्याने सामन्यानंतर म्हटले आहे की ‘आम्ही आयपीएल खेळत आहोत, क्लब क्रिकेट नाही. पंचांनी त्यांचे डोळे उघडे ठेवायला पाहिजे. शेवटच्या चेंडूवर असा निर्णय ही योग्य गोष्ट नाही. अटीतटीच्या सामन्यात जर असे निर्णय झाले तर मला माहित नाही काय होईल. पंचांनी अधिक सजग रहायला हवे.’
याबरोबरच मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्मानेही पंचांच्या निर्णयावर नाराजी व्यक्त केली आहे. तो म्हणाला, ‘मला मैदानातून बाहेर गेल्यावर कळाले. कोणीतरी मला सांगितले की तो नो बॉल होता. अशा प्रकारच्या चूका या क्रिकेटसाठी योग्य नाही. या षटकाच्या आधीच्या षटकातील बुमराहने टाकलेला तो चेंडूही वाईड नव्हता. अशा गोष्टी या सामना बदलवणाऱ्या असतात.’
तसेच तो म्हणाला, ‘खेळाडू काही करु शकत नाही. ते फक्त सामना संपल्यावर हस्तांदोलन करु शकतात कारण तो शेवटचा चेंडू होता. हे पाहणे निराशाजनक होते. आशा आहे की ते त्यांच्या चुका सुधारतील जशा आम्ही सुधारतो.’
याबरोबरच सामन्याबद्दल बोलताना विराट म्हणाला, ‘जेव्हा ते(मुंबई) 7 बाद 145 धावांवर होते, तोपर्यंत आम्ही चांगल्या स्थितीत होतो. पण शेवटचे काही षटके आमच्यासाठी फारच वाईट ठरली.’
त्याचबरोबर विराटने एबी डिविलियर्सने केलेल्या अर्धशतकाबद्दल कौतुकही केले. तसेच शेवटच्या काही षटकातील गोलंदाजीची कामगिरी सुधारावी लागेल असेही म्हटले आहे. तसेच त्याने म्हटले की जसप्रीत बुमराह मुंबईकडे असल्याने ते भाग्यवान आहेत.
मुंबईकडून शेवटच्या काही षटकात हार्दिक पंड्याने तुफानी फलंदाजी करत 14 चेंडूत नाबाद 32 धावांची खेळी केली. त्यामुळे मुंबईला प्रथम फलंदाजी करताना 8 बाद 187 धावसंख्या उभारता आली.
मुंबईला प्रतिउत्तर देताना बेंगलोरकडून एबी डिविलियर्सने नाबाद 70 धावांची अर्धशतकी खेळी केली. तसेच विराटने 46 धावांची खेळी केली. या दोघांनीमिळून तिसऱ्या विकेटसाठी 49 धावांची भागीदारीही केली. पण अन्य फलंदाजांनी खास काही न केल्याने बेंगलोरला 20 षटकात 5 बाद 181 धावाच करता आल्या.
महत्त्वाच्या बातम्या –
–सामना पराभूत झाला असला तरी कोहली, डिविलियर्सने केले हे मोठे पराक्रम
–दिग्गज ऑलिंपियन मायकल फेल्प्स घेतोय रिषभ पंतकडून फलंदाजीचे धडे, पहा व्हिडिओ
–आरसीबी आणि कर्नाटक क्रिकेट असोसिएशनने भारतीय सेनेसाठी उचलले मोठे पाऊल…