आयपीएल २०२१ स्पर्धेत बायो बबल भेदून कोरोनाने शिरकाव झाल्याचे पाहायला मिळाले होते. त्यामुळे आयपीएल २०२१ स्पर्धा २९ सामन्यांनंतर अनिश्चित काळासाठी स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. पण यानंतर २९ मे रोजी बीसीसीआयने याच मुद्द्यावर चर्चा करण्यासाठी विशेष सर्वसाधारण सभेचे आयोजन केले होते. यामध्ये आयपीएल स्पर्धा खेळवण्याचा महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. आयपीएलचे उर्वरित सामने सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यात युएईमध्ये होणार आहेत.
तसेच या स्पर्धेत इंग्लंड आणि बांगलादेश बोर्डाने खेळाडूंना खेळण्याची परवानगी दिली नाही. कारण त्यांच्या राष्ट्रीय संघाच्या मालिका सप्टेंबर-ऑक्टोबर दरम्यान आहेत. तसेच आणखीही काही स्टार परदेशी खेळाडू या स्पर्धेत उपस्थित राहणार नसण्याची शक्यता आहे. याबाबत बीसीसीआयचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांनी आपले मत मांडले आहे.
राजीव शुक्ला म्हणाले की, “आम्ही परदेशी खेळाडूंच्या खेळण्याबाबतही चर्चा केली आहे. ही स्पर्धा खेळवणे हा आमचे मुख्य उद्देश्य आहे. त्यामुळे आम्ही हे मध्येच सोडू शकत नाही. त्यामुळे जो परदेशी खेळाडू उपलब्ध आहे तो ठीक आहे. जो उपलब्ध नसेल त्याच्यासाठी ही स्पर्धा थांबवली जाणार नाही. यामध्ये काही भारतीय आणि काही परदेशी खेळाडूंचा ही समावेश आहे. फ्रेंचाईजी, उपलब्ध असतील ते नवीन खेळाडू आपल्या संघात समाविष्ट करू शकतात. आम्ही त्यांच्यासोबत ही स्पर्धा पूर्ण करू.”
स्टेडियममध्ये प्रेक्षकांना सामना पाहण्याची संधी मिळणार का?
प्रेक्षकांच्या स्टेडियममधील उपस्थितीबद्दल शुक्ला म्हणाले की, “समस्या फक्त हीच आहे की, त्यांना सामना पाहण्याची परवानगी दिली जायला हवी की नाही. आम्ही युएईच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या निर्देशांचे पालन करू. ते जर म्हणाले की, काही टक्केच लोकांना सामना पाहण्याची संधी द्या तर आम्ही तेही करण्यास तयार आहोत. तसेच जर ते म्हणाले की, प्रेक्षकांशिवाय ही स्पर्धा खेळवा तर त्यासाठीही आम्ही तयार आहोत.”
आयपीएल स्पर्धेला केव्हा होणार प्रारंभ?
जरी आयपीएल २०२१ स्पर्धा पूर्ण होणार असल्याचे बीसीसीआयने सांगितले असले तरी अजून तारखा निश्चित करण्यात आलेल्या नाहीत. याबद्दल बोलताना शुक्ला म्हणाले की, “बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली, सचिव जय शाह आणि आयपीएलचे अध्यक्ष ब्रिजेश पटेल हे लवकरच युएईमध्ये येणार आहेत. आम्ही याबाबत क्रिकेट बोर्ड आणि इतर अधिकाऱ्यांसोबत देखील चर्चा करणार आहोत. सर्व कार्यक्रम ठरला आहे. त्यामुळे स्पर्धा ही चांगली होईल, जशी गतवर्षी झाली होती. यासोबतच, युएईमध्ये लागू असलेल्या कोरोना नियमांचेही काटेकोरपणे पालन केले जाईल.”
महत्त्वाच्या बातम्या –
WTC Final: ‘या’ कारणामुळे न्यूझीलंड भारतीय संघाला ठरु शकतो वरचढ, माजी भारतीय कर्णधाराने मांडले मत