---Advertisement---

ऑलिम्पिकमध्ये ऐतिहासिक विजयानंतर गोलपोस्टवर का बसला श्रीजेश? स्वत:च केलाय खुलासा

On: शुक्रवार, ऑगस्ट 6, 2021 12:39 AM
---Advertisement---

ऑलिम्पिकमध्ये ४१ वर्षानंतर भारतीय पुरुष हॉकी संघाला पदक पटकावण्यात यश आले आहे. भारताने गुरुवारी (५ ऑगस्ट) झालेल्या कांस्यपदकाच्या लढतीत जर्मनीचा ५-४ ने पराभव करून हा इतिहास रचला. मागील ४१ वर्षापासून भारतीय हॉकीला ऑलिम्पिकमध्ये एकही पदक मिळवता आले नव्हते. परंतु, अखेर तब्बल ४ दशकांनी हॉकीमध्ये पदक विजयाची प्रतिक्षा मनप्रीत सिंगच्या नेतृत्त्वाखाली खेळणाऱ्या भारतीय संघानं संपवली. भारतीय हॉकी संघाच्या या ऐतिहासिक विजयानंतर संपूर्ण देशात आनंद साजरा केला जात आहे. याबरोबरच भारताच्या या विजयात मोलाचा वाटा उचलणाऱ्या गोलरक्षक पीआर श्रीजेशचेही कौतुक होत आहे.

श्रीजेशचा फोटो होतोय व्हायरल
भारताच्या या विजयासह जगातील सर्वोत्तम गोलरक्षकांपैकी एक असलेल्या पीआर श्रीजेशचे ऑलिम्पिक पदक विजयाचे स्वप्न आज पूर्ण झाले आहे.आपल्या शेवटच्या ऑलिम्पिकमध्ये उतरलेल्या पीआर श्रीजेश या ऐतिहासिक विजयानंतर प्रचंड खूश असल्याचे दिसत होता. तो विजयानंतर चक्क गोलपोस्टवर जाऊन बसला होता. त्याचा गोलपोस्टवर बसलेला फोटो सध्या प्रचंड व्हायरल होत आहे.

या फोटोबद्दल श्रीजेश म्हणाला की, ‘मी माझे संपूर्ण आयुष्य गोलपोस्टवर घालवले आहे. गोलपोस्ट हे माझ्यासाठी सर्वकाही आहे. या फोटोद्वारे मला सांगायचे होते की मी या गोलपोस्टचा मालक आहे. मी आनंद साजरा केला कारण निराशा, दु:ख हे सर्व मी आणि माझ्या या गोलपोस्टने एकत्र शेअर केलं आहे. गोलपोस्टही सन्मानास पात्र आहे.’

श्रीजेश क्वचितच विजयाचा आनंद साजरा करताना दिसून येतो. परंतु त्याने भारतासाठी त्याच्या कारकिर्दीतील या ऐतिहासिक आणि सर्वात मोठ्या विजयावर खूप आनंद साजरा केला आहे. अत्यंत शांत स्वभावाचा गोलरक्षक श्रीजेश नेहमी दबावाच्या वेळी चांगली कामगिरी करताना दिसतो.

अनुभव लावला पणाला
श्रीजेश विजयाबद्दल म्हणाला की, ‘मी गेली २१ वर्षे हॉकी खेळतो आहे. आज मी माझा २१ वर्षांचा अनुभव या ६० मिनिटांसाठी खर्ची केला.’ शेवटच्या पेनल्टीवर तो म्हणाला की, ‘मी फक्त स्वतःला सांगितले की तू २१ वर्षांपासून हा गेम खेळत आहेस, आता तुला हे करायचे आहे आणि पेनल्टी वाचवायची आहे.’ श्रीजेश गेल्या अनेक वर्षांपासून भारतीय हॉकी संघाचा प्रमुख सदस्य राहिला आहे.

महत्त्वाच्या बातम्या – 

‘द हंड्रेड’ स्पर्धेत पुन्हा पडला चौकार, षटकारांचा पाऊस; ३६ वर्षीय फलंदाजाने ४३ चेंडूत ठोकल्या ८१ धावा

‘ऑलिम्पिक २०२४ मध्ये क्रिकेटचाही समावेश करा’, इंग्लंड-भारत कसोटीदरम्यान प्रेक्षकाने केली मागणी

भाड्याने जमीन घेऊन शेती करणाऱ्या कुटुंबातील पोरानं भारताला जिंकून दिलं ‘रौप्य’ पदक

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---