भारत आणि इंग्लंड यांच्यात सुरू असलेल्या ४ सामन्यांच्या कसोटी मालिकेत भारतीय संघ २-१ ने पुढे आहे. यात मालिकेतील पहिला सामना इंग्लंड संघाने २२७ धावांनी जिंकला होता, तर दुसऱ्या सामन्यात भारतीय संघाने इंग्लंड संघाला ३१७ धावांनी पराभूत केले होते . नुकत्याच पार पडलेल्या तिसऱ्या कसोटी सामन्यात भारतीय संघाने २ दिवसात सामना जिंकत इतिहासाला गवसणी घातली आहे. या मालिकेत एकीकडे रोहित शर्मा फलंदाजीमध्ये उत्कृष्ट कामगिरी करत आहे. तर दुसरीकडे भारतीय कसोटी संघाचा उपकर्णधार अजिंक्य रहाणेवर टिकांचे सत्र सुरू आहे. अशातच माजी भारतीय फलंदाज प्रवीण आमरेने रहाणेचे समर्थन केले आहे.
तिसऱ्या कसोटी सामन्यात, भारतीय संघाकडून रोहितने अर्धशतक केले होते. त्याने पहिल्या डावात ६६ धावांची खेळी करत भारतीय संघाच्या विजयात मोलाची भूमिका बजावली होती. तर दुसरीकडे मेलबर्न कसोटीमध्ये ११२ धावांची खेळी करणाऱ्या रहाणेला या मालिकेत फलंदाजी करताना अधिकाधिक धावा करण्यात अपयश येताना दिसत आहे.
अशातच माजी भारतीय फलंदाज आणि रहाणेचे फलंदाजी प्रशिक्षक आमरे यांनी त्याला समर्थन करत म्हटले आहे की, “सध्या फलंदाजी करणे सोपे नाही राहिले. तुम्ही पाहू शकता की मागील ८ कसोटी सामन्यात रहाणे, रोहित शर्मा आणि आर अश्विनला सोडून इतर कुणीही शतक केलेले नाही. शतकांची संख्या कमी होणे म्हणजे इकडे फलंदाजी करणे सोपे नाहीये.”
“दुसऱ्या कसोटीत रहाणेने शतक करणे महत्वाचे होते. परंतु तो शतक करेपर्यंत टिकू शकला नाही. मात्र त्यावेळी रहाणेने रोहितसोबत मिळून दमदार भागीदारी केली होती. संघाच्या विजयात योगदान देणेही तितकेच महत्त्वाचे आहे. असं नाही आहे की यश मिळवण्यासाठी नेहमी मोठी खेळी खेळायला हवी,” असे त्यांनी शेवटी म्हटले.
या मालिकेत भारतीय संघाकडून रोहित शर्मा आणि आर अश्विन यांनाच शतक झळकावण्यात यश आले आहे. संघाचा कर्णधार विराट कोहली देखील गेल्या काही महिन्यांपासून शतकाच्या प्रतीक्षेत आहे. अजिंक्य रहाणेने मेलबर्न मध्ये ११२ धावांची खेळी खेळली होती. त्यांनतर त्याला एकही मोठी खेळी खेळता आली नाही. इंग्लंडविरुद्ध सुरू असलेल्या कसोटी मालिकेत अजिंक्यने १, ०, ६७ आणि १० धावांची खेळी केली आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
सुपरमॅन! हवेत सूर मारत पंड्याने एकहाती पकडला भन्नाट झेल, व्हिडिओ पाहून करालं वाहवा
त्याचं नशीबचं इतकं खराब होतं की सचिनबरोबर पदार्पण केलं, पण खेळला एकच कसोटी सामना