आयपीएल 2021 मध्ये पंजाब किंग्ज विरुद्ध मुंबई इंडियन्स यांच्यात झालेल्या सामन्यात पंजाब किंग्जने मुंबईला 9 गडी राखून सहज पराभूत करत स्पर्धेत दमदार पुनरागमन केले. या सामन्यामध्ये पंजाब संघाकडून यंदाच्या मोसमातील आपला पहिला सामना खेळणाऱ्या रवी बिश्नोईने आपल्या फिरकीने मुंबई संघातील फलंदाजांना सळो की पळो करून सोडले.
या सामन्यात त्याने आपल्या फिरकीच्या जादूने 4 षटकांत 21 धावा देऊन मुंबईच्या दोन फलंदाजांना तंबूत धाडले आणि मुंबई इंडियन्सला 131 धावांत रोखण्यात महत्वपूर्ण कामगिरी बजावली. या सामन्यानंतर आपल्यालाही गोलंदाजी करण्याची संधी मिळेल असा आपल्याला विश्वास नसल्याचे सांगितले आहे.
सामन्यानंतर पत्रकार परिषदेत तो म्हणाला की, “कर्णधार मला म्हणाला की तू आपल्या गोलंदाजीशी सुसंगत असायला हवे. त्याने मला पाठिंबा दर्शविला आणि म्हणाला की जर तुझ्या गोलंदाजीवर कठोर परिश्रम केले, तर ते तुझ्यासाठी अधिक चांगले ठरणार आहे. तसेच त्याने मला सांगितले की जरा थांब तुझापण नंबर येईल. मी पण त्याचीच वाट पाहत होतो आणि आज शेवटी आज माझा नंबर आला.”
रवीने कर्णधार राहुल आणि पंजाब किंग्ज संघ व्यवस्थापनाने त्याच्यावर आत्मविश्वास दाखवल्याचे कबूल केले आहे. या मोसमातील पहिला सामना खेळणाऱ्या रवीने जबरदस्त गोलंदाजी केली. त्यामुळे कर्णधाराने त्याला 17 वे षटक टाकण्यास दिले. त्यावरती तो म्हणाला की, “जेव्हा एखाद्या वेळेस संघकर्णधार आणि व्यवस्थापक जर तुमचे समर्थन करून तुम्हाला संधी देत असतील. अशावेळी तुम्ही जर चांगली कामगिरी केली तर तुमचा स्वतःचा तसेच कर्णधाराचा आणि संघ व्यवस्थापकांचा तुमच्यावरील विश्वास वाढतो. जेव्हा जेव्हा मला संधी मिळाली आहे, तेव्हा मी चांगली कामगिरी करण्याचा प्रयत्न केला आहे. मी गोलंदाजी करताना परिस्थिति चांगली आहे की वाईट आहे हे कधीच पाहत नाही.”
पंजाबचा कर्णधार केएल राहुलनेही या सामन्यानंतरच्या सादरीकरणात रवीचे कौतुक केले. यामध्ये तो म्हणाला की, “आम्हाला संघ म्हणून एकत्रितपणे पुढे जायचे आहे. पहिल्या सामन्यानंतरही मी म्हटलो होतो की, आमचा संघ हा एक युवा संघ आहे. दरवर्षी संघात आम्ही नवीन खेळाडू जोडतो. परंतु आपण संयम राखला पाहिजे. आमच्या संघातील शाहरूख खान आणि रवी बिश्नोई चांगले खेळत असून मिळालेल्या संधीचे सोने करत आहेत. रवी चांगली कामगिरी करेल असा मला विश्वास होता. सुरुवातीच्या सामन्यात त्याला संधी मिळाली नाही. कारण तो प्रशिक्षकांसोबत काही गोष्टी व्यवस्थित करण्यात व्यस्त होता. तो खूप निडर खेळाडू असून तो स्वतःला संयमित ठेवून खूप चांगली गोलंदाजी करतो.”
महत्त्वाच्या बातम्या-
पंजाबच्या ‘या’ शिलेदाराने बलाढ्य चेन्नईविरुद्ध झळकावले होते शतक, तरीही मिळाली नाही टीम इंडियात जागा
गोलंदाजी करता येईना अन् फलंदाजीही जमेना, अष्टपैलू हार्दिक पंड्या मुंबई इंडियन्सवर बनलाय ओझं!
चार सामन्यात ना षटकार ना अर्धशतक, मुंबईतील ‘या’ खेळाडूला डच्चू देण्याच्या मागणीने धरला जोर