दक्षिण आफ्रिकेविरुद्धची टी२० मालिका संपल्यावर भारतीय संघ आयर्लंडच्या दौऱ्यावर जाणार आहे. त्यातील काही खेळाडू इंग्लंडच्या दौऱ्याला रवाना होत असल्याने आयर्लंड दौऱ्यासाठी हार्दिक पांड्या (Hardik Pandya) भारतीय संघाचे नेतृत्व करणार आहे. या दौऱ्यात भारतीय संघ दोन टी२० सामने खेळणार आहेत. राहुल त्रिपाठी (Rahul Tripathi) याची या दौऱ्यासाठी संघात निवड करण्यात आली आहे. या दौऱ्यात त्याला अंतिम अकरामध्ये स्थान मिळाले तर त्याचे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण असणार आहे. मात्र त्याच्या निवडीबाबत भारताच्या माजी खेळाडूने आश्चर्यकारक विधान केले आहे.
इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) २०२२च्या हंगामात राहुल सनराइजर्स हैदराबादकडून खेळला. त्याने १४ सामन्यात १५८च्या स्ट्राईक रेटने ४१३ धावा केल्या होत्या. या हंगामात तो सर्वाधिक धावा करणारा अनकॅप्ड खेळाडू ठरला. त्याची दक्षिण आफ्रिकेविरुद्ध निवड व्हायला पाहिजे होती. मात्र निवडकर्त्यांनी त्याला वगळले. आयर्लंड दौऱ्यासाठी त्याला संधी देण्यात आली आहे.
भारतीय संघाचे माजी फलंदाज आकाश चोप्रा यांनी राहुलला आयर्लंड विरुद्ध खेळण्याची संधी मिळणार नाही अशी भविष्यवाणी केली आहे. स्टार स्पोर्ट्सशी बोलताना ते म्हणाले, “दक्षिण आफ्रिकेविरुद्ध संघात आधीच ९ फलंदाज आहेत. दक्षिण आफ्रिका विरुद्ध दीपक हुड्डा आणि वेंकटेश अय्यर यांना पण खेळवले नाही.”
“संजू सॅमसन यालाही आयर्लंड दौऱ्याच्या अंतिम अकरामध्ये संधी मिळण्याची शक्यता कमी आहे. जे खेळाडू आधीपासून संघात आहे त्यांचा अंतिम अकरामध्ये खेळण्याचा हक्क पहिला आहे,” असे पुढे चोप्रा यांनी म्हटले आहे.
भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका या टी२० मालिकेतही पहिल्या चार सामन्यासाठी भारतीय संघात कोणताच बदल केला नव्हता. या मालिकेत खेळणारे हुड्डा आणि वेंकटेश अय्यर यांना बाकावरच बसावे लागले आहे. त्यांना शेवटच्या सामन्यातही संधी मिळते का नाही हे पाहण्याजोगे आहे. भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका अंतिम आणि मालिका निर्णायक सामना रविवारी (१९ जून) बंगळुरू येथे खेळला जाणार आहे.
आयर्लंडच्या दौऱ्यासाठी सॅमसन बरोबरच सूर्यकुमार यादव याचेही संघात पुनरागमन झाले आहे. जवळपास त्याची अंतिम अकरामध्ये जागा निश्चित आहे. अशातच राहुलला संधी मिळण्याच्या आशा कमी होताना दिसत आहेत.
या दौऱ्यातील पहिला टी२० सामना २६ जून आणि दुसरा टी२० सामना २८ जूनला खेळला जाणार आहे.
आयर्लंड दौऱ्यासाठीचा भारतीय संघ खालीलप्रमाणे:
हार्दिक पंड्या (कर्णधार), भुवनेश्वर कुमार (उपकर्णधार), इशान किशन, ऋतुराज गायकवाड, संजू सॅमसन, सूर्यकुमार यादव, वेंकटेश अय्यर, दीपक हुड्डा, राहुल त्रिपाठी, दिनेश कार्तिक (यष्टीरक्षक), युझवेंद्र चहल, अक्षर पटेल, आर. बिश्नोई, हर्षल पटेल, आवेश खान, अर्शदीप सिंग, उमरान मलिक.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
‘कर्णधार’ म्हणून पहिली टी२० मालिका जिंकण्याची पंतकडे संधी, सीरिज गमावल्यास मोडेल ‘तो’ अजेय विक्रम
कर्णधार पंतपुढे टी२० मालिका वाचवण्याचे आव्हान, निर्णायक सामन्यात कोणाचे पारडे जड? पाहा प्लेइंग Xi
पंतने खेळलेल्या ‘त्या’ चालीचे नेहराजींनी केले कौतुक, म्हणाले ‘या गोष्टी महत्त्वाच्या असतात’






