भारत आणि अफगाणिस्तान (Odi series between IND vs AFG) यांच्यात 3 सामन्यांची वनडे मालिका 13 जूनपासून सुरू होत असून, याद्वारे टीम इंडियाने 2027 च्या वनडे विश्वचषकाची तयारी सुरू केली आहे. अफगाणिस्तानविरुद्धचा कसोटी सामना भारताने एक डाव आणि 300 धावांनी जिंकला होता, त्यामुळे आता वनडे मालिकेतही अशाच धडाकेबाज कामगिरीची अपेक्षा आहे. मालिकेतील पहिला सामना धर्मशाला येथे होणार आहे, परंतु तिथे पावसाचे सावट आहे. भारतीय हवामान विभागाने धर्मशालामध्ये 13 ते 16 जून या कालावधीसाठी ‘येलो अलर्ट’ दिला आहे.
12 जून रोजी तिथे ‘ऑरेंज अलर्ट’ आहे. हवामान रिपोर्टनुसार, 13 जून रोजी सामन्याच्या वेळी 90% पावसाची शक्यता आहे. संध्याकाळपर्यंत पावसाचे प्रमाण 65% पर्यंत कमी होऊ शकते. यामुळे सामन्यात पावसाचा व्यत्यय येणे निश्चित असून, ओव्हर्स कमी होऊ शकतात किंवा सामना रद्द होण्याचीही भीती आहे.
13 जून रोजी धर्मशालाचे तापमान 12 ते 18 अंश सेल्सिअसच्या दरम्यान राहण्याची शक्यता आहे. सामना दुपारी 1:30 वाजता सुरू होईल आणि टॉस 1:00 वाजता होईल. दोन्ही संघांमध्ये आतापर्यंत एकूण 4 वनडे सामने झाले आहेत, त्यापैकी 3 सामने भारताने जिंकले आहेत, तर 1 सामना ‘टाय’ झाला आहे. महत्त्वाचे म्हणजे, याआधी दोन्ही संघ फक्त मोठ्या स्पर्धांमध्ये (Multi-nation tournaments) आमनेसामने आले होते. भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील ही पहिलीच ‘द्विपक्षीय’ (Bilateral) वनडे मालिका आहे. धर्मशालाच्या मैदानावर होणाऱ्या या पहिल्या वनडे सामन्यासाठी प्रेक्षक खूप उत्सुक आहेत, मात्र पावसाचे काय होते, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.






