Ranji Trophy : सध्याच्या ट्वेन्टी-20च्या जमान्यात भारताच्या बहुतांश खेळाडूंकडून इंडियन प्रीमियर लीगला प्राधान्य दिले जात आहे. परंतु ‘आयपीएल’मध्ये सहभाग नोंदवयाचा असल्यास आधी खेळाडूंना किमान तीन-चार रणजी सामने खेळणे अनिवार्य करण्याचा ‘बीसीसीआय’ विचार करत आहे. कारण, युवा खेळाडूंनी केवळ ‘आयपीएल’चा विचार करू नये यासाठी आता कठोर नियम करणे गरजेचे झाले आहे, असा ‘बीसीसीआय’मध्ये मत आहे.
सध्या बीसीसीआयने आणि राष्ट्रीय निवडकर्त्यांनी इंग्लंड मालिकेसाठी टीम इंडियाच्या बाहेर असलेल्या खेळाडूंबाबत एक कठोर निर्णय घेतला आहे. कारण भारतीय संघाबाहेर असलेल्या खेळाडूंना रणजी ट्रॉफीची पुढील फेरी खेळण्याच्या सक्त सूचना बोर्डाने दिल्या आहेत. तसेच बीसीसीआयने 16 फेब्रुवारीपासून सुरू होणाऱ्या रणजी ट्रॉफीच्या पुढील फेरीपूर्वी खेळाडूंना आपापल्या रणजी संघात सामील होण्यास सांगितले आहे.
तसेच इशान किशनसारख्या खेळाडूने रणजी सोडून आयपीएलची तयारी सुरू केली असताना हा निर्णय घेण्यात आला आहे. त्याचबरोबर श्रेयसलाही कसोटी संघात पुनरागमन करण्यासाठी रणजीमध्ये चांगली कामगिरी करावी लागणार आहे. याबरोबरच, ईशानने मानसिक आरोग्याचे कारण देत गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये दक्षिण आफ्रिका दौऱ्यातून माघार घेतली होती. यानंतर तो अफगाणिस्तानविरुद्ध टी-20 मालिकाही खेळला नाही. तसेच इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठीही त्याचा संघात समावेश करण्यात आलेला नाही.
यावर भारताचे प्रशिक्षक राहुल द्रविड म्हणाले होते की, इशानला पुनरागमन करण्यासाठी देशांतर्गत क्रिकेट खेळावे लागेल. तसेच, तो रणजी ट्रॉफी खेळला नाही आणि त्याच्या संघ झारखंडमध्ये सामील झाला नाही किंवा त्याने त्यांना कोणतीही माहिती दिली नाही. याबरोबरच प्रशिक्षकाच्या सल्ल्याकडे दुर्लक्ष करून ईशान बडोद्याला पोहोचला आणि हार्दिक पांड्या आणि कृणाल पंड्यासोबत सराव करताना पहायला मिळाला होता.
दरम्यान, बीसीसीआयचा रणजी खेळण्याचा सल्ला केवळ इशान आणि श्रेयसलाच लागू होणार नाही, तर क्रुणाल आणि दीपक चहरसारख्या खेळाडूंनाही लागू होईल. जे सध्या कसोटी क्रिकेटमध्ये भारतीय संघ व्यवस्थापनाच्या योजनांमध्ये नाहीत. तसेच श्रेयसच्या खराब फॉर्ममुळे त्याला इंग्लंडविरुद्धच्या शेवटच्या तीन सामन्यांतून संघातून वगळण्यात आले आहे.
महत्वाच्या बातम्या –