भारताचा दिग्गज क्रिकेटपटू विराट कोहली याने (Virat Kohli) शनिवारी (१५ जानेवारी) कसोटी संघाचे नेतृत्व सोडत असल्याचे सांगितले. त्याच्या या निर्णयाने अनेकांना धक्का बसला. विराटने सोशल मीडियावर पोस्ट करत कसोटी कर्णधारपद सोडण्याचा निर्णय जाहीर केला. त्याच्या पोस्टनंतर अनेक आजी-माजी क्रिकेटपटूंनी प्रतिक्रिया दिली आहे. यातील माजी भारतीय प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी दिलेल्या प्रतिक्रियेने सर्वांचेच लक्ष वेधले.
विराटच्या नेतृत्त्वपदाची सर्वाधिक वर्षे ही शास्त्री यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण झाली. विराटने जानेवारी २०१५ साली भारतीय कसोटी संघाचे नियमित कर्णधारपद स्विकारले, तेव्हा शास्त्री भारतीय संघाचे संचालक होते, तर त्यानंतर २०१७ ते २०२१ ते भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक राहिले. विराटने जानेवारी २०१७ पासून तिन्ही आंतरराष्ट्रीय क्रिकेट प्रकारात भारताचे नियमित कर्णधारपद सांभाळण्यास सुरुवात केली होती. त्यामुळे विराट आणि शास्त्री यांच्यात चांगले मैत्रीपूर्ण संबंधही पाहायला मिळाले. त्यांच्या कर्णधार-प्रशिक्षक जोडीने भारताला अनेक मोठे विजय मिळवून दिले.
विराट काही दिवसांपूर्वीच भारताच्या टी२० आणि वनडे संघाच्या कर्णधारपदावरून पायउतार झाला होता. आता तो कसोटी कर्णधारपदावरूनही पायउतार झाल्याने त्याच्या नेतृत्त्वाचे पर्व संपले आहे.
यानंतर शनिवारी रवी शास्त्रींनी विराटच्या नेतृत्त्वाबद्दल ट्वीट केले की, ‘विराट, तू अभिमानाने मान ताठ ठेवू शकतो. तू जे कर्णधार म्हणून मिळवलंय ते खूप कमी लोकांच्या वाटेला येतं. नक्कीच भारताचा सर्वाधिक आक्रमक आणि यशस्वी (कर्णधार). वैयक्तिकरित्या माझ्यासाठी ही वाईट बातमी, कारण आपण एकत्र मिळून हा संघ उभा केला होता.’
https://twitter.com/RaviShastriOfc/status/1482365980827594753
विराट हा भारताचा सर्वात यशस्वी कसोटी कर्णधार आहे. त्याने भारताचा कर्णधार म्हणून सर्वाधिक कसोटी विजय मिळवले आहेत. त्याने आत्तापर्यंत ६८ कसोटी सामन्यात भारताचे नेतृत्त्व केले होते. त्याने यातील ४० सामन्यात विजय मिळवला असून १७ सामन्यात पराभव स्विकारला आहे. तसेच ११ सामने त्याच्या नेतृत्त्वाखाली अनिर्णित राहिले.
विराटनेही मानले शास्त्रींचे आभार
विराट कोहलीनेही कसोटी कर्णधारपद सोडताना केलेल्या पोस्टमध्ये रवी शास्त्रींचे विशेष आभार मानले आहेत. त्याने लिहिले आहे की, ‘रवी भाई (रवी शास्त्री) आणि सपोर्ट स्टाफ यांचेही आभार, ते कसोटी क्रिकेटमध्ये सातत्याने प्रगती करणाऱ्या या गाडीचे इंजिन होते. तुम्ही सर्वांनी ध्येय प्रत्यक्षात गाठण्यासाठी सर्वात मोठा वाटा उचलला.’
महत्त्वाच्या बातम्या –
पीकेएलमध्ये शनिवारी रंगला ‘ट्रिपल पंगा’! दिल्ली, युपीचे विजय; मुंबा-बंगाल यांच्यात थरारक टाय
पाचवी ऍशेस कसोटी दुसऱ्याच दिवशी रोमांचक अवस्थेत; स्मिथच्या खांद्यावर ऑस्ट्रेलियाची जबाबदारी
कसोटी कर्णधारांतील ‘ध्रुवतारा’ बनला विराट!
व्हिडिओ पाहा – १००९ धावा करणारा प्रणव धनावडे आहे तरी कुठे?






