भारतीय संघाच्या महान खेळाडूंपैकी एक असलेल्या विराट कोहलीने शनिवारी (१५ जानेवारी) त्याच्या चाहत्यांना एक मोठा झटका दिला. विराटने भारताच्या कसोटी संघाचे कर्णधारपद सोडण्याचा निर्णय घेतला आहे. शुक्रवारी (१४ जानेवारी) दक्षिण अफ्रिकेविरुद्ध कसोटी मालिकेत भारतीय संघ पराभूत झाल्यानंतर विराट कोहलीने हा निर्णय घेतला आहे. त्याने सोशल मीडियाच्या माध्यमातून या मोठ्या निर्णयाची माहिती सर्वांना दिली. असे असले तरी, विराट भारताचा आतापर्यंतचा सर्वात यशस्वी कसोटी कर्णधार राहील. भारताने त्याच्या नेतृत्वाता सर्वाधिक कसोटी सामने जिंकले आहेत.
विराटने कर्णधारपद सोडल्याची पोस्ट करताना म्हटले आहे की, ‘संघाला योग्य मार्गाने पुढे नेण्यासाठी गेली ७ वर्षे कठोर परिश्रम, चिकाटीने प्रयत्न केले. मी प्रामाणिकपणे काम केले आणि यात कसलीही कसर सोडलेली नाही. पण प्रत्येक गोष्ट कोणत्या ना कोणत्या टप्प्यावर थांबली पाहिजे आणि भारताचा कसोटी कर्णधार म्हणून थांबण्याची माझी वेळ आली आहे.’
जागतिक कसोटी क्रिकेटमधील तिसरा सर्वात यशस्वी कसोटी कर्णधार
विराट कोहलीच्या नेतृत्वात भारतीय संघाने जेवढे सामने जिंकले, तेवढे इतर कोणत्याच कर्णधाराच्या कार्यकाळात जिंकले नाहीत. जागतिक क्रिकेटमधील सर्वात यशस्वी कसोटी कर्णधारांमध्ये विराट तिसऱ्या क्रमांकावर राहिल. जगातील सर्वात यशस्वी कसोटी कर्णधारांच्या यादीत दक्षिण अफ्रिकेचा माजी कर्णधार ग्रॅमी स्मिथ (Graeme Smith) आहे, त्याच्या नेतृत्वात दक्षिण अफ्रिकेने ५३ कसोटी सामने जिंकले. या यादीत दुसऱ्या क्रमांकावर ऑस्ट्रेलियाचा दिग्गज रिकी पॉंटिंग आहे, ज्याच्या नेतृत्वात ऑस्ट्रेलियाने ४८ कसोटी सामने जिंकलेले. विराट या यादीत तिसऱ्या क्रमांकावर आहे. भारताने विराटच्या नेतृत्वात आतापर्यंत ४० कसोटी सामने जिंकले होते. हा आकडा अजून खूप पुढे गेला असता, परंतु विराटने अचानकपणे कसोटी कर्णधारपद सोडल्यानंतर आता तशी शक्यता उरलेली नाही.
सेना देशांमध्ये सर्वाधिक कसोटी विजय मिळवणारा आशियाई कर्णधार
याचसोबत विराट आशियामधील असा कर्णधार देखील ठरला आहे, ज्याने सेना (SENA) देशांमध्ये (दक्षिण अफ्रिका, न्यूझीलंड, ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड) सर्वाधिक कसोटी सामने जिंकले आहेत. विराटच्या नेतृत्वात भारताने सेना देशांमध्ये सात कसोटी सामने जिंकले आहेत. या यादीत दुसऱ्या क्रमांकावर पाकिस्तानचे माजी कर्णधार वसीम अक्रम आहेत, त्याने संघाला सेना देशात चार कसोटी सामने जिंकवून दिले आहेत. जावेद मियॉंदाद या यादीत तिसऱ्या क्रमांकावर आहेत, पाकिस्तानने त्यांच्या नेतृत्वात सेना देशांमध्ये चार कसोटी सामने जिंकले. पाकिस्तानचे माजी कर्णधार मुश्ताक मोहम्मद आणि मिस्बाह उल हल, तसेच माजी भारतीय कर्णधार एम पतौडी आणि एसएस धोनी या चौघांनी सेना देशातील प्रत्येकी तीन कसोटी सामन्यांमध्ये स्वतःच्या देशाला विजय मिळवून दिला आहे.
दरम्यान, विराटने कसोटी संघाचे नेतृत्व सोडताना बीसीसीआय, संघाचे माजी मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री, संपूर्ण सपोर्ट स्टाफ यांचे आभार मानले. त्याला कर्णधारपदासाठी पात्र समजल्यासाठी विराटने माजी कर्णधार एमएस धोनीचेही आभार मानले.
महत्वाच्या बातम्या –
विराटने कसोटी कर्णधारपद सोडताना का घेतले धोनीचे नाव? नक्की काय ठरलं याला कारण?
विराटचा कसोटी कर्णधारपदाचा राजीनामा! पद सोडताना लिहिली भली मोठी पोस्ट, वाचा काय म्हटलंय…
फिरकीपटू नॅथन लायनने भल्याभल्या फलंदाजांना सोडले मागे, दिवस-रात्र कसोटीत षटकारांचा केला भीमपराक्रम
व्हिडिओ पाहा –